संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) अध्यक्षा अॅनालेना बेअरबॉक त्यांच्या आगामी भारत दौऱ्यात भारतीय नेत्यांशी सध्याचे जागतिक प्रश्न आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा करणार आहेत. बेअरबॉक २८ एप्रिल रोजी भारतात येणार असून महासभेच्या अध्यक्षा म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. यापूर्वी त्यांनी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री म्हणून भारताला भेट दिली होती.
भारत आणि चीन हे संयुक्त राष्ट्र आणि बहुपक्षीयवादाचे दोन प्रमुख समर्थक देश आहेत. त्यामुळे महासभेच्या अध्यक्षा सध्याचे जागतिक प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेपुढील आव्हानांवर चर्चा करतील. संयुक्त राष्ट्रांची सनद पाळणे, ही संस्था अधिक मजबूत करणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या तिन्ही स्तंभांवरील बहुपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या महत्त्वावर त्या भर देतील, असे त्यांच्या कार्यालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महासभेच्या ८० व्या सत्राच्या अध्यक्षा असलेल्या बेअरबॉक २९ ते ३० एप्रिल दरम्यान चीनचा दौरा करतील. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सरकारच्या निमंत्रणावरून हे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. भारत दौऱ्यात बेअरबॉक परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच त्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि भारतातील संयुक्त राष्ट्रांच्या पथकाशी संवाद साधतील.
चीनमध्ये त्या उपराष्ट्रपती हान झेंग आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतील. तिथेही त्या संयुक्त राष्ट्रांच्या स्थानिक पथकाशी चर्चा करणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नवी दिल्लीतील 'एआय इम्पॅक्ट समिट'साठी भारताचा दौरा केला होता.