India US Relations : अमेरिकेतील कथित भारतविरोधी वक्तव्यांवर मार्को रुबिओंचे उत्तर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप मोठे फॅन (चाहते) आहेत, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केले आहे. अमेरिकेत भारतविरोधी वक्तव्ये आणि वर्णद्वेषाच्या घटना वाढत असल्याच्या आरोपांना त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले. 

एका पत्रकार परिषदेत रविवारी विचारलेल्या प्रश्नावरून सोशल मीडियावर सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सर्वोच्च राजनैतिक अधिकाऱ्याने हे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. मार्को रुबिओ सध्या भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत आणि सुदृढ करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

कथित वर्णद्वेषाच्या वादावर अमेरिकेची भूमिका स्पष्ट
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये चीन आणि भारताचा उल्लेख 'हेलहोल' (नरक) असा करण्यात आला होता. यावरून भारतीय वंशाच्या नागरिकांबद्दल अमेरिकेत वर्णद्वेषी टिप्पण्या होत असल्याचा प्रश्न एका पत्रकाराने रुबिओ यांना विचारला होता. 

त्याला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारतासोबतचे संबंध सुधारायचे नसते, तर त्यांनी मला येथे पाठवलेच नसते. इतकेच नाही तर त्यांनी त्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सर्जिओ गोर यांची भारतामध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली नसती. आधुनिक युगात सोशल मीडियावर अनेक लोक काहीही वेडेवाकडे लिहीत असतात. ते लोक खरे आहेत की खोटे, हे देखील माहीत नसते. प्रत्येक देशात काही मूर्ख लोक असतात, अशा शब्दांत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तान आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पाकिस्तानच्या भूमिकेविषयी काही चिंता व्यक्त करण्यात आली का, असे विचारले असता रुबिओ यांनी दोन्ही देशांच्या सीमापार दहशतवादावरील भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, पाकिस्तानी भूमीवरून भारताविरुद्ध कारवाया करणाऱ्या सशस्त्र दहशतवादी संघटनांबाबत भारताला नेहमीच काळजी वाटते आणि भारताने हा मुद्दा सातत्याने मांडला आहे. 

मात्र, इराणच्या समस्येमध्ये पाकिस्तानने मध्यस्थ किंवा सुलभकर्ता म्हणून बजावलेल्या भूमिकेबाबत भारतासोबतच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. भारताचे पाकिस्तानसोबतचे वाद हे पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचे आणि दहशतवादाशी संबंधित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.