रमजानमधील उपवास ही केवळ आध्यात्मिक साधना नसून शरीराच्या शिस्तीची परीक्षाही आहे. उपवासाचे प्रदीर्घ तास आणि झोपण्याच्या बदलत्या पद्धतींमुळे सहरी आणि इफ्तारमध्ये तुम्ही काय खाता-पिता, याचा तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. आजच्या लेखातून रमजानमध्ये निरोगी उपवासासाठी काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घेऊया.
रमजानमध्ये निरोगी उपवासासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी
तुमच्या उपवासाची सुरुवात संतुलित सहरीने करा. यामध्ये तृणधान्ये, ओट्स किंवा ब्राऊन राईस यांसारख्या पिष्टमय पदार्थांचा समावेश करा. सोबतच अंडी, दही किंवा कडधान्यांमधून मिळणारी प्रथिने घ्या. हे पदार्थ हळूहळू पचतात आणि तुम्हाला जास्त वेळ तृप्त ठेवण्यास मदत करतात.
इफ्तारच्या वेळी खाण्याची सुरुवात हळुवार करा. पाणी, खजूर, फळे किंवा सूप प्यायल्याने पोटावर ताण न येता शरीरातील पाणी आणि ऊर्जेची पातळी पूर्ववत होण्यास मदत होते. अन्न सावकाश खा आणि प्रदीर्घ उपवासानंतर शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ द्या.
रमजानमध्ये झोपेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, परंतु पुरेशी विश्रांती थकवा आणि चक्कर टाळण्यास मदत करते. दुपारची छोटी डुलकी आणि इफ्तारनंतर लवकर झोपल्याने फायदा होऊ शकतो.
सहरी आणि इफ्तारमध्ये कोणते पदार्थ खाणे टाळावे?
सहरीच्या वेळी जास्त मीठ असलेले पदार्थ टाळावेत. अशा पदार्थांमुळे तहान वाढते आणि उपवास करणे कठीण होऊ शकते. इफ्तारमध्ये तळलेले पदार्थ, अति गोड मिठाई आणि रस्सा असलेले पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणे आणि ऊर्जा कमी होणे अशा समस्या जाणवू शकतात. साखरेची पेये तात्काळ उत्साह देतात पण त्यानंतर लगेचच थकवा जाणवतो. इफ्तारला गरजेपेक्षा जास्त खाणे ही एक सामान्य चूक असून याचा परिणाम पचन आणि झोप या दोन्हीवर होतो.
रमजानमध्ये उपवास करताना शरीरातील पाण्याचे प्रमाण कसे टिकवावे?
पाणी पिण्याचे नियोजन इफ्तार आणि सहरीच्या दरम्यान विभागले पाहिजे. एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी थोडे थोडे पाणी प्या. आहारामध्ये फळे, भाज्या आणि सूप यांसारख्या पाणीदार पदार्थांचा समावेश करा.
सहरीच्या वेळी चहा किंवा कॉफीचे अतिसेवन टाळा, कारण कॅफीनमुळे शरीरातील द्रव पदार्थ कमी होऊ शकतात. नारळ पाणी, दूध आणि जास्त साखर नसलेली घरगुती पेये हे चांगले पर्याय आहेत.
उपवासाच्या काळात व्यायाम करणे सुरक्षित आहे का?
हो. शरीराची ताण देणारे हलके व्यायाम, चालणे किंवा सौम्य योगासने करणे सुरक्षित आहे. जड व्यायाम इफ्तारनंतर करणे अधिक चांगले असते, कारण तेव्हा शरीराला पाणी आणि अन्न मिळालेले असते.