भारताची सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताने ‘अशी’ घडवली क्रांती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताने 'सेमीकंडक्टर क्रांती'च्या दिशेने मोठी आणि वेगाने वाटचाल सुरू केली आहे. आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचे 'पाठीचा कणा' मानले जाणारे सेमीकंडक्टर, स्मार्टफोनपासून ते संरक्षण प्रणालीपर्यंत प्रत्येक उपकरणात वापरले जातात. या महत्त्वाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनून भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे एक जागतिक केंद्र बनण्याचे स्वप्न पाहत आहे.
 
स्मार्टफोन, टेलिव्हिजनपासून ते उपग्रहांपर्यंतच्या उपकरणांसाठी सेमीकंडक्टर्स आवश्यक आहेत. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा हा कणा आहे. जागतिक चिप बाजार २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर ओलांडेल, असा अंदाज आहे. आयात-आधारित अर्थव्यवस्थेतून भारत जागतिक पातळीवर विश्वासार्ह उत्पादन आणि डिझाईन भागीदार बनण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे पीआयबीने नमूद केले आहे.  

कॅबिनेटने ३७०६ कोटींच्या सेमीकंडक्टर युनिटला मंजुरी; २००० रोजगार निर्मिती
या परिवर्तनाचं केंद्र आहे इंडिया सेमीकंडक्टर मिशन (आयएसएम). डिसेंबर २०२१ मध्ये ७६,००० कोटींच्या बजेटसह हे मिशन सुरू झालं.  सेमीकंडक्टर चिप्सचं उत्पादन, संयोजन, चाचणी, पॅकेजिंग आणि डिझाईन यांना पाठबळ देण्याचं उद्दिष्ट आहे.

संशोधन आणि विकास तसेच उद्योग-शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याचाही यात समावेश आहे. उद्योग डेटानुसार, २०२३ मध्ये भारताचा सेमीकंडक्टर बाजार सुमारे ३८ अब्ज डॉलरचा होता. २०३० पर्यंत हा बाजार १००-११० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.

हा अपेक्षित विकास अनेक सरकारी योजनांमुळे शक्य होत आहे.  सेमीकंडक्टर फॅब्स योजनेतून उत्पादन युनिट्ससाठी ५० टक्क्यांपर्यंत आर्थिक पाठबळ दिलं जातं. डिस्प्ले फॅब्स, पॅकेजिंग (एटीएमपी/ओसाट) आणि स्टार्टअप्ससाठी डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह (डीएलआय) योजनेसाठी खास योजना आहेत.

आतापर्यंत या योजनांअंतर्गत सहा मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.  टाटा ग्रुप, मायक्रॉन टेक्नॉलॉजी, सीजी पॉवर, कायन्स सेमीकॉन आणि एचसीएल-फॉक्सकॉन उपक्रम यांच्याकडून मोठ्या गुंतवणुकींचा यात समावेश आहे. ही युनिट्स दरमहा लाखो चिप्स आणि वेफर्स तयार करतील. यातून देशांतर्गत आणि जागतिक मागणी पूर्ण होईल.  
 
योजना आणि आर्थिक मदत
'इंडिया सेमीकंडक्टर मिशन'अंतर्गत अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे उद्योगाला प्रोत्साहन मिळत आहे. यात 'सेमीकंडक्टर फॅब्स योजना', 'डिस्प्ले फॅब्स योजना' आणि 'डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (DLI) योजना' यांचा समावेश आहे. या योजना उद्योगाला आर्थिक मदत आणि इतर प्रोत्साहन देतात.

'सेमीकंडक्टर फॅब्स योजना' आणि 'डिस्प्ले फॅब्स योजना' यांसारख्या मोठ्या योजनांमध्ये सरकार प्रकल्पाच्या खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत देते. 'डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (DLI) योजनेअंतर्गत, चिप डिझाइन करणाऱ्या भारतीय कंपन्यांना त्यांच्या खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत मदत दिली जाते. यामुळे देशात नवीन चिप डिझाइन आणि तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत मिळत आहे.

भारत चिप डिझाईनमध्येही प्रगती करत आहे. नोएडा आणि बेंगलुरूमध्ये नव्या ३-नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्रांनी नाविन्याची झेप घेतली आहे. डीएलआय योजने अंतर्गत २२ स्टार्टअप्सना २३४ कोटींचं पाठबळ मिळालं आहे. हे स्टार्टअप्स मोबाईल नेटवर्क, स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स, टेहळणी यंत्रणा आणि ऑटोमोटिव्हसाठी चिप्सवर लक्ष केंद्रित करत आहेत.  कौशल्य विकास हा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे.

८५,००० पेक्षा जास्त अभियंत्यांना प्रगत उत्पादन आणि चिप डिझाईनचं प्रशिक्षण दिलं जात आहे. एनआयईएलआयटी कॅलिकटच्या स्मार्ट लॅब कार्यक्रमांतर्गत ४४,००० पेक्षा जास्त अभियंते प्रमाणित झाले आहेत. पर्ड्यू युनिव्हर्सिटी आणि आयबीएम, लॅम रिसर्च यांसारख्या जागतिक कंपन्यांशी भागीदारीमुळे स्थानिक प्रतिभा जागतिक दर्जाशी जोडली जात आहे.

भारताच्या वाढत्या सेमीकंडक्टर महत्त्वाकांक्षा सेमिकॉन इंडिया परिषदेतून दिसून येतात. ही परिषद सेमीसोबत भागीदारीत आयोजित केली जाते. २०२५ ची आवृत्ती २ ते ४ सप्टेंबरला नवी दिल्लीतील यशोभूमी येथे होणार आहे. यात १८ देशांतील ३०० पेक्षा जास्त प्रदर्शक असतील. यात खास देश पॅव्हेलियनचा समावेश आहे.  

कोविड-१९ साथीच्या रोगाने आणि युक्रेन युद्धासारख्या भू-राजकीय तणावाने चिप पुरवठ्यासाठी काही देशांवर अवलंबून राहण्याचे धोके दाखवले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचं स्थानिक उत्पादनाचं पाऊल राष्ट्रीय सुरक्षा आणि पुरवठा साखळीच्या मजबुतीसाठी महत्त्वाचं आहे.  प्रचंड अभियंता समूह आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला पाठबळ देणारी मजबूत लघु-मध्यम उद्योग यंत्रणा यामुळे भारत सेमीकंडक्टरच्या संपूर्ण जीवनचक्रात योगदान देण्यासाठी सज्ज होत आहे.

यात कच्च्या मालाच्या प्रक्रियेपासून प्रगत चिप डिझाईनपर्यंतचा समावेश आहे.  मंजूर प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. नव्या गुंतवणुकींची घोषणा होत आहे. भारताचं चिप अवलंबित्वातून नेतृत्वाकडे जाणारं परिवर्तन जोरात सुरू आहे. “अवलंबित्वातून वर्चस्वाकडे, चिप क्रांती खरी आहे आणि ती इथे, भारतात, आता घडत आहे,” असं पीआयबीने नमूद केलं.