'यामुळे' पाकिस्तानचे होणार चार तुकडे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 11 d ago
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर

 

 पाकिस्तान गाढ झोपेत असताना भारताने केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानला नवा धडा मिळाला आहे. येत्या दहा वर्षात पाकिस्तानचे चार तुकडे होतील, तेव्हा मात्र पाकिस्तानचे नाव नामशेष होईल. पुढील काही वर्षातच पाकिस्तानची शकले होण्यास सुरुवात होईल. एकूण चार तुकडे होतील. सिंध भाग पाकिस्तानातून वेगळा होईल. दुसरा बलुचिस्तान. याच बलुचिस्तानमध्ये पूर्वी मराठा साम्राज्य होते. अजूनही तिथे मराठी भाषेचा वापर होतो. या भागात छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती वापरली जाते. ते पाकिस्तानबरोबर राहू इच्छित नाही. त्यानंतर आहे खैबर पख्तुनख्वा. या प्रांताची सीमा अफगाणिस्तान आणि चीनला लागून आहे. हे तिन्ही प्रांत पाकिस्तानापासून वेगळे झाले, तर केवळ पंजाब पाकिस्तान उरेल. त्यावेळी पाकिस्तानचे नाव इतिहासजमा होईल. असे असले तरी भारताची पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी लढाई आहे. अजूनही वेळ आली, तर 'ऑपरेशन सिंदूर' शिवाय दुसरे ऑपरेशन राबविण्यासही भारत मागेपुढे पाहणार नाही, हे लक्षात घ्यायला लागेल.

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला, त्याचदिवशी याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील हे निश्चित होते. भारताने सावध पवित्रा घेत 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी केले. यात बरेच दहशतवादी मारले गेले आहेत. मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद आणि इतर ठिकाणी हल्ला केला. भारताने हा हल्ला पाकिस्तानच्या सैनिकी छावण्यांवर केला नसून, दहशतवादी अड्डयांवर केला. या कारवाईमध्ये सहभागी झालेले वैमानिक आणि क्षेपणास्त्रांचा मारा करणारे सर्व अधिकारी तरुण होते, हे विशेष.

पाकिस्तानने या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी उत्तर देताना तो काहीही करायला तयार असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच भारतातील कोणत्याही क्षेत्रावर हल्ला करण्यासाठी गोळीबार करेल. सीमावर्ती भागावर तो आक्रमण, हल्ला करू शकतो. परंतु आता पाकिस्तानच्या कोणत्याही कृत्याला 'जशास तसे' उत्तर देण्यास भारत तयार असणार आहे. हा वाद पाकिस्तानशी वा तेथील सामान्य जनतेशी नाही, तर क्रूर दहशतवाद्यांशी आहे. आवश्यकता पडली, तर भारताकडून पाकिस्तानलाही असाच धडा शिकविला जाईल. पाकिस्तानने भारताला सीमा उल्लंघन करायला भाग पाडू नये, अशी भारताची भूमिका आहे.

हल्ल्यानंतर मुख्य दहशतवादी हाफीज हा पळून गेल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे. परंतु तो खरंच पळाला की नाही, हे अद्याप समोर आले नाही. भारताविरोधात काम करणाऱ्या पाकिस्तानचे सैन्य आणि त्यांना मदत करणारे दहशतवादी यांच्याविरोधात भारत देश कायमच उभा राहणार आहे. जगातील ५८ देश भारताच्या भूमिकेसोबत आहेत. यावरून पाकिस्तानवर वाढत असलेला दबाव लक्षात येतो. दहशतवादाचे चटके कुणालाच नको आहेत. म्हणूनच या कारवाईद्वारे भारताने शत्रूला सडेतोड उत्तर दिले आहे.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अनेक दहशतवादी मारले असून, पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत तयार आहे, हे या कारवाईतून सिद्ध झाले आहे. काही वर्षांमध्ये पाकिस्तानचे चार तुकडे होतील, अशीच परिस्थिती आहे.

- लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter