'काश्मीरच्या प्रगतीसाठी तुमचीही साथ असू द्या'

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
'बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन' च्या मुलींची 'सकाळ' कार्यालयाला भेट
'बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन' च्या मुलींची 'सकाळ' कार्यालयाला भेट

 

पुणे: ‘मी नाशिकमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेऊन आता डॉक्टर झालेआहे. आतामाझ्या ज्ञानाचा उपयोगमलाकाश्मीरमधील लोकांसाठी करायचा आहे. तिथल्या लोकांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मार्गदर्शन करायचे आहे, कारण त्याची त्यांना सर्वाधिक गरज आहे’, असे सांगत होती डॉ. सरवर जान. काश्मीरला पुढे घेऊन जाण्यात तुमचे सहकार्य असू द्या अशा शब्दांत उपस्थितांना तिने हाक दिली. ‘मी काश्मीर ते कन्याकुमारी असा विलक्षण प्रवास केला तो बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनमुळे. सध्या मीअभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. भविष्यात फाऊंडेशनसह काम करून या ऋणांची परतफेड करायची आहे’, हे उद्गार होते गुलशन आरा या तरुणीचे.

काश्मीर निवासी असलेल्या आणि दहशतवादी हल्ल्यांत पालक गमावलेल्या तरुणींनी हे अनुभव मांडले. निमित्त होते, बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनतर्फे आयोजित या मुलींच्या महाराष्ट्र दौऱ्याचे. या दौऱ्यांतर्गत सुमारे चाळीस मुलींनी सोमवारी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देत आपले अनुभव सांगितले. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच, कार्यालयातील विविध विभागांना भेट देत वृत्तपत्राचे कामकाज समजून घेतले. यावेळी मायेची ऊब मिळाल्याने मुली भारावून गेल्या होत्या. याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम तसेच ॲड. नरसिंग लगड, प्रकाश गोरे, वीरेंद्र शहा आदी उपस्थित होते. तर त्याच्या कुटुंबीयांवर ओढवलेले भयानक प्रसंग ऐकून उपस्थितांचे मने हेलावली.

“जम्मू-काश्मीरमध्ये आम्हाला मोकळ्या वातावरणात फिरता येत नव्हते. असुरक्षितता जाणवत होती. सर्वत्र लष्करी जवान खडा पहारा देत होते. अशा वेळी आमचे शिक्षण व संगोपन होणार किंवा नाही. या चिंतेत असतानाच आम्हाला बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनने मायेची ऊब दिली. त्यामुळे जीवनाला भरारी मिळाली आहे.” असे त्या मुलींनी  सांगितले.

हे फाउंडेशन जम्मू-काश्मीरमध्ये युद्धाची व दहशतवादी हल्ल्यांची झळ बसलेल्या मुलांच्या सामाजिक-शैक्षणिक उत्थानासाठी काम करते. या मुलांना दरवर्षी विविध राज्यांची सफर घडवली जाते. यंदा चाळीस मुलींना महाराष्ट्रातील शहरांच्या भेटीवर आणले आहे. कोल्हापूर,नारायणगाव आदी गावांना भेट दिली. त्यानंतर या मुली पुण्यात आल्या होत्या. शनिवारवाड्यासह आगाखान पॅलेस आणि  पुण्यातील विविध स्थळांची सैर आनंददायी होती, असा अनुभव या मुलींनी सांगितला.   

या वेळेस बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनचे संस्थापक अधिक कदम यांनी ही संस्थेची स्थापना कशी झाली. ते करत असलेल्या कामाची माहिती दिली. काश्मीरमधील अनाथ मुलींना तसेच मुलांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही काम करतो. ही मुले-मुली लहान वयातच काश्मीरमधून बाहेर पडल्यास त्यांची मातृभूमीशी असलेली नाळ तुटते आणि त्यांना काश्मीरबद्दल आत्मीयता राहत नाही. त्यामुळे त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण काश्मीरमध्येच पूर्ण होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन

३३० मुलींचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे काम बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन (बीडब्ल्यूएफ) ही संस्था गेल्या २६ वर्षांपासून करत आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदिक कदम असून तेमुळचेश्रीगोंदा येथील आहेत. गेली अनेक दशकांपासूनजम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतताआहे. साहजिकच अस्थिरता : भीतीयांच्यासावटामुळे मुलींच्या मनावर मोठा आघातझाला होता. अनेकांनी आपले पालक गमावले. बऱ्याच जणींचे शैक्षणिक नुकसानहीहोत होते. आदिक कदम यांच्या लक्षात ही बाब आली. आपण या मुलांसाठी केले पाहिजे ही अस्वस्थता त्यांना शांत बसू देईना. या तळमळीतूनच  अनाथ मुलींचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी आदिक कदम यांच्या बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनला सुरुवात झाली.