इम्रान खान यांना सर्व प्रकरणात जामीन मंजूर

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 11 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इस्लामाबादः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे रोजी  अटक करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्याविरुद्ध खटले सुरु होते. मात्र त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये आगडोंब उसळला. काल (१३ मे) इस्लामाबाद हायकोर्टाने इम्रान खान यांना सर्वच प्रकरणात जामीन दिला आहे.

 

इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारासह देशभरात अनेक खटले सुरू आहेत. इस्लामाबाद पोलिसांनी मंगळवारी इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक केल्याची माहिती दिली. अल-कादिर ट्रस्ट केस इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि त्यांच्या पीटीआय पक्षाच्या इतर नेत्यांवर अल-कादिर विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भातील आरोपांशी संबंधित आहे. हे प्रकरण त्यांचे सरकार आणि प्रॉपर्टी टायकून यांच्यातील कथित समझोत्याशी संबंधित आहे. त्यामुळे पाकिस्ताच्या अर्थव्यवस्थेला ५०  अब्ज रुपयांचे नुकसान झाले.

 

अटकेनंतर इम्रान खान समर्थकांनी थेट लष्करी कार्यलयांवर हल्ला केला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येत आहे. बलुचिस्तानमधील क्वेटा येथे पाकिस्तानी लष्कराने निदर्शना दरम्यान आंदोलकांवर गोळीबार केला. गोळ्या लागल्याने अनेक आंदोलक जखमी झाले आहेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. याच अनुषंगाने आता सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.

 

दरम्यान, इस्लामाबाद हायकोर्टाने अलकादिर केससहीत इतर सर्व प्रकरणांमध्ये इम्रान यांना जामीन दिला आहे. शिवाय १७ मे पर्यंत त्यांच्यार कोणत्याच प्रकरणात अटकेची कारवाई करु नये, असं म्हटलं आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल असीन मुनीर यांना खुलेआम धमकी दिली होती. जर मला पुन्हा अटक केली तर देशात अराजकता माजेल, अशा थेट इशारा इम्रान यांनी दिला आहे.