संकटकाळात मित्रांना वाचवणाऱ्या ११ वर्षीय मोहम्मदचा राष्ट्रपतींकडून सन्मान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मोहम्मद सिद्दान पी. याला 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार' प्रदान करताना
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मोहम्मद सिद्दान पी. याला 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार' प्रदान करताना

 

संकटाच्या वेळी दाखवलेले प्रसंगावधान आणि अदम्य धाडस यामुळे अनेकदा मोठे अनर्थ टळतात. केरळमधील पलक्कड येथील एका लहान मुलाने हेच सिद्ध करून दाखवले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून विजेचा धक्का लागलेल्या आपल्या दोन मित्रांचे प्राण वाचवणाऱ्या मोहम्मद सिद्दान पी. याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अवघ्या ११ वर्षांच्या सिद्दानने दाखवलेल्या या शौर्याची देशभरात चर्चा होत आहे.
 

त्यावेळी नेमके काय घडले?

ही घटना अत्यंत थरारक होती. सिद्दान आणि त्याचे मित्र एकत्र असताना अचानक दोन मुलांना विजेचा जोरदार धक्का बसला. परिस्थिती अत्यंत नाजूक आणि भीतीदायक होती. मुले विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याचे पाहून कोणालाही काय करावे हे सुचत नव्हते. मात्र, अशा कठीण प्रसंगी सिद्दानने डगमगून न जाता कमालीचे प्रसंगावधान दाखवले. त्याने क्षणाचाही विलंब न करता आजूबाजूला पाहिले आणि एक लाकडी काठी शोधून काढली. या कोरड्या लाकडी काठीचा वापर करून त्याने विजेचा धक्का लागलेल्या आपल्या दोन्ही मित्रांना शिताफीने प्रवाहापासून दूर केले.

त्याच्या या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे दोन निष्पाप मुलांचे प्राण वाचले. विजेसारख्या धोकादायक गोष्टीचा सामना करताना त्याने दाखवलेली समज त्याच्या वयापेक्षा कितीतरी मोठी होती. त्याच्या या निस्वार्थ वृत्तीची आणि धाडसाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित एका शानदार सोहळ्यात त्याला 'शौर्य' श्रेणीत या पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी त्याचे कौतुक केले. संकटाच्या वेळी घाबरून न जाता बुद्धीचा वापर कसा करावा, याचे उत्तम उदाहरण मोहम्मद सिद्दानने घालून दिले आहे.

विशेष सन्मान 

अदम्य साहस आणि विशेष कामगिरीसाठी या वर्षी देशभरातील किमान २० मुलांना 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२५' देऊन गौरवण्यात आले. यामध्ये केरळमधील ११ वर्षांच्या मोहम्मद सिद्दान पी. याचाही समावेश आहे. 

हा पुरस्कार सोहळा 'वीर बाल दिवसा'च्या निमित्ताने पार पडला. शीखांचे दहावे गुरु, गुरु गोबिंद सिंह जी यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंह जी आणि साहिबजादा फतेह सिंह जी यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. 

यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, सुमारे ३२० वर्षांपूर्वी गुरु गोबिंद सिंह जी आणि त्यांच्या चारही पुत्रांनी सत्य व न्यायाच्या रक्षणासाठी लढताना सर्वोच्च बलिदान दिले. दोन धाकट्या साहिबजादांच्या शौर्याचा भारत आणि परदेशातही आदर केला जातो, असेही त्यांनी नमूद केले.

पुरस्कार विजेत्या मुलांबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या, "या मुलांनी त्यांचे कुटुंब, समाज आणि संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. हे पुरस्कार भारतातील सर्व मुलांना नक्कीच प्रेरणा देतील."

काय आहे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार?

'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार' हा १८ वर्षांखालील मुलांसाठी असलेला भारतातील सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आहे. भारताचे सन्माननीय राष्ट्रपती दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करतात. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा सहा श्रेणींमधील असाधारण कामगिरीसाठी हा सन्मान दिला जातो. राष्ट्रीय स्तरावरील मुलांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रेरणा देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
 

पात्रता निकष

हा पुरस्कार भारतात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिक असलेल्या मुलांना दिला जातो. संबंधित वर्षाच्या ३१ जुलै रोजी मुलाचे वय ५ ते १८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ज्या कार्यासाठी, घटनेसाठी किंवा कामगिरीसाठी नामांकन करण्यात येत आहे, ती गोष्ट अर्जाच्या अंतिम तारखेपूर्वीच्या दोन वर्षांच्या कालावधीत घडलेली असावी.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter