मुस्लिम आमदारांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देताना.
मुंबईसह राज्यातील मस्जिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘सह्याद्री’ अतिथिगृहावर मुस्लिम शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करवल्याचा गंभीर आरोप मुस्लिम संघटनांनी केला. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याला सोमय्या जबाबदार असतील, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. यावर अजित पवार यांनी पोलिसांना चुकीच्या पद्धतीने कारवाई टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीला मुंबईचे पोलिस आयुक्त देवेंद्र भारती, अबू आझमी, नवाब मलिक, झीशान सिद्दीकी, सना मलिक यांच्यासह मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुस्लिम संघटनांनी मस्जिदींवरील भोंगे जबरदस्तीने उतरवले जात असल्याचा आरोप केला. किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलिस कारवाई करत असल्याचा दावाही त्यांनी केला. “सोमय्या यांनी मशिदींमध्ये जाऊ नये, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आवाज मर्यादेचं पालन अवघड
मुस्लिम संघटनांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार करताना सांगितलं की, उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ४६ ते ५६ डेसिबल आवाज मर्यादेचं पालन करणं अत्यंत अवघड आहे. यावर पोलिस आयुक्त देवेंद्र भारती यांनीही सहमती दर्शवली आणि ही आवाज मर्यादा प्रत्यक्षात पाळणं शक्य नसल्याचं मान्य केलं. यावेळी अजित पवार यांनी पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालकांना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले, पण त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने कारवाई टाळण्याचंही बजावलं.
मुस्लिम शिष्टमंडळाने भोंग्यांच्या मुद्दा संवेदनशीलतेने हाताळणी करण्याची मागणी केली. त्यांनी यावरून सामाजिक तणाव वाढू शकतो, याकडेही प्रशासनाचं लक्ष वेधलं. अजित पवार यांनी यावर प्रशासनाला संतुलित दृष्टिकोन ठेवण्यास सांगितलं आणि कोणत्याही परिस्थितीत सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. सोमय्या यांच्या दबावामुळे पोलिस कारवाई तीव्र झाल्याचा मुस्लिम संघटनांचा दावा होता, आणि यामुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
या बैठकीत कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणि सामाजिक समरसता राखण्यावर विशेष भर देण्यात आला. अजित पवार यांनी पोलिसांना सूचना दिल्या की, कोणत्याही कारवाईत नियमांचं पालन होईल, पण कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. याशिवाय, भोंग्यांच्या मुद्द्यावरून सामाजिक तणाव टाळण्यासाठी सर्व संबंधित पक्षांशी संवाद साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या बैठकीने भोंग्यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीवर चर्चा करून प्रशासनाला संतुलित कारवाईचे मार्गदर्शन केलं.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter