मृदंगातून घुमतोय धार्मिक ऐक्याचा गजर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 d ago
मृदंग बनविण्यात तल्लीन झालेले मुस्लिम कारागीर.
मृदंग बनविण्यात तल्लीन झालेले मुस्लिम कारागीर.

 

आषाढी वारीनिमित्त सध्या सर्वत्र दिंडी सोहळ्यानिमित्त टाळ-मृदंगाच्या साथीने विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यासह मराठवाड्यातील ठिकठिकाणच्या मृदंगांतून धार्मिक ऐक्याचा गजरही घुमत आहे; कारण यातील अनेक मृदंगांची निर्मिती छत्रपती संभाजीनगरात झालीय, तीही मुस्लिम कुटुंबातील कारागिरांकडून.

छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण दरवाजा परिसरात मृदंग (पखवाज), तबलानिर्मितीची पारंपरिक दुकाने आहेत. शंभर वर्षांपूर्वीपासूनची निर्मिती परंपरा सांगितली जाते. निजामकाळात या निर्मितीला आणखी चालना मिळाली. तेव्हा अमीर बक्श फैज बक्श यांचे नाव यासाठी आदराने घेतले जात असे. याशिवाय नंतरच्या काळात इब्राहिम बक्श, मोहम्मद बक्श ही नावे मृदंग, तबला, ढोलक बनविण्यासाठी प्रसिद्ध होती. आज या कुटुंबातील सदस्य हे कार्य पुढे नेत आहेत.
 
पैठण दरवाजा परिसरातील सब्जीमंडी भागात सय्यद मुख्तार हे अमीर बक्श फैज सय्यद मुख्तार हे पन्नास वर्षांपासून मृदंग, तबला बनवित आहेत. त्यांची मुले फेरोज आणि मोहसीन यांची साथ त्यांना मिळत आहे. याशिवाय मोहम्मद बक्श यांचा वारसा त्यांचे नातू शेख रफिक सध्या समर्थपणे पुढे नेत आहेत. याशिवाय याच परिसरात शेख मतीन यांच्याकडूनही तबलानिर्मिती होत आहे. सय्यद ख्वाजा यांचेही मृदंग-तबला निर्मिती क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे. राज्यभरातून वादक, वारकरी याठिकाणी मृदंग, तबला खरेदीसाठी येतात.

या परंपरेविषयी फिरोज सय्यद म्हणतात, "काळपासून आमचे हिंदू बांधव आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघाले आहेत. या वारीत टाळ आणि मृदंगाचा आवाज घुमतो. मृदंग बनवण्याचं काम आम्ही करतो. दरवर्षी आषाढी वारीच्या महिनाभर आधीपासून नवीन मृदंग बनविण्यास वेग देतो. या परिसरात अनेक मुस्लिम कारागीर मृदंग बनवण्याचं काम करतात. १०० वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे. यामध्ये आम्हाला धर्म अडकाठी निर्माण करत नाही. जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील विविध भागांसह नाशिक, नगर जिल्ह्यातूनही अनेक जण मृदंगाच्या खरेदीला शहरात येतात. शिवाय वर्षभरही मृदंगाच्या दुरुस्तीचीही कामे असतात." 

मृदंगाच्या मागणीविषयी रफिक शेख म्हणतात, "जिल्ह्यातील अनेक दिंड्या पंढरपूरच्या वारीसाठी जातात. त्यामुळे अनेक लोक मृदंग खरेदी करतात. या कालावधीतच मृदंगाला जास्त मागणी असते. त्यामुळे आम्ही नवीन मृदंगाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करतो. मृदंग बनवण्याच्या व्यवसायातून किमान चार ते पाच जणांना रोजगार मिळतो. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आमच्या दुकानात भाविकांची रेलचेल सुरू असते. यावेळी न कळत समाजाला धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश मिळतो." 

मृदंगासाठी लागते हे साहित्य
मृदंग तयार करण्यासाठी विविध साहित्य लागते. यात खोड हे उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून मागविले जाते. चमडा हा सोलापूरहून येतो, वादी पुण्यात तयार होते. लोखंडी पावडर असलेली शाई ही गुजरातमधून मागविली जाते, तर या साहित्यापासून बनलेली पुडी ही स्थानिक पातळीवर तयार केली जाते, असे शेख रफिक यांनी सांगितले.

नवी खरेदी, जुन्याची दुरुस्ती
वारीच्या काळात तसेच चातुर्मासाच्या कालावधीत अनेक वारकऱ्यांकडून जुन्या मृदंगाचीही दुरुस्ती केली जाते. जुन्या मृदंगाच्या दुरुस्तीला साधारणपणे चार ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो, तर नवीन मृदंगाचे दर साधारणपणे चार ते दहा हजार रुपयांपर्यंत आहेत. यात खोडाच्या गुणवत्तेनुसार दरांमध्ये आणखी वाढ असू शकते.

- संजय कुलकर्णी 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter