आशिया चषक विजेत्या टीम इंडियावर बीसीसीआयचा कोट्यावधींचा 'धनवर्षाव'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून (ACC) मिळणाऱ्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त ही रक्कम असेल. भारतीय संघाने अंतिम सामन्यानंतर ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून चषक स्वीकारण्यास नकार दिला होता, त्याची भरपाई म्हणून बीसीसीआयने हा 'ऐतिहासिक आणि देशभक्तीपर' निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा केली. यानुसार, संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला २५ लाख रुपये दिले जातील.

या निर्णयाबद्दल बोलताना देवजीत सैकिया म्हणाले, "बीसीसीआयने आशिया चषक २०२५ जिंकणाऱ्या भारतीय संघाला १५ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम आशियाई क्रिकेट परिषदेकडून मिळणाऱ्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त आहे. संपूर्ण देशाप्रमाणेच, बीसीसीआयलाही आपल्या खेळाडूंचा खूप अभिमान आहे."

"ज्या प्रकारे संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवला आणि त्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी आपल्या देशाच्या सशस्त्र दलांप्रति आणि पहिलगाम हल्ल्यातील पीडितांप्रति सन्मान दाखवत, दहशतवादी देशाच्या प्रतिनिधीच्या हातून चषक स्वीकारण्यास नकार दिला, ते कौतुकास्पद आहे. यामुळे, आम्ही त्यांना हे बक्षीस देत आहोत," असे सैकिया यांनी सांगितले.

यापूर्वी, अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया चषक जिंकला होता. पाकिस्तानने दिलेले १४७ धावांचे लक्ष्य भारताने सहज पार केले होते, ज्यात कुलदीप यादवने ४ बळी घेतले आणि टिळक वर्माने नाबाद ६९ धावा केल्या होत्या.

मात्र, सामन्यानंतरच्या बक्षीस वितरण सोहळ्यात, भारतीय संघाने पाकिस्तानचे गृहमंत्री असलेल्या ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून चषक स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर नक्वी यांनी तो चषक आणि खेळाडूंची पदके स्वतःसोबत नेली होती. बीसीसीआय या प्रकरणावर पुढील आयसीसी बैठकीत तीव्र निषेध नोंदवणार असल्याचेही सैकिया यांनी स्पष्ट केले आहे.