ICC Women's World Cup : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका; यंदाचा महिला विश्वचषक ठरणार सर्वात चुरशीचा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
क्रिकेट संघ
क्रिकेट संघ

 

महिला क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी 'आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६' स्पर्धा आजपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू होत आहे. यंदाची स्पर्धा आधीपेक्षा अधिक मोठी आणि आव्हानात्मक असून, सातत्याने सुधारणा करणाऱ्या भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांकडून ऑस्ट्रेलियाच्या पारंपरिक वर्चस्वाला मोठे आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज होणाऱ्या पहिल्या उद्घाटनाच्या सामन्यात यजमान इंग्लंड आणि श्रीलंका आमनेसामने येतील.

१२ देशांचा सहभाग आणि नव्या दमाचे खेळाडू

यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच १२ संघ सहभागी होत असून, यामध्ये आयर्लंड आणि नेदरलँड्स या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. २००९ नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन ब्रिटनमध्ये केले जात आहे. या स्पर्धेत न्यूझीलंडच्या २५ वर्षीय कर्णधार अमेलिया केर हिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल, जिने नैराश्यावर मात करून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आहे. भारतीय संघात एन. श्री चरणी, यास्तिका भाटिया आणि नंदनी शर्मा यांसारख्या युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, जे जेष्ठ खेळाडूंच्या सोबतीने संघाची ताकद वाढवतील.

ऑस्ट्रेलियाला नमवून इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज

गेल्या नऊपैकी सहा स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा कमी करणे सोपे नसले, तरी भारतीय संघ यंदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गेल्या वर्षी ५० षटकांचा विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. आता भारतीय संघाची नजर एकाच वेळी वन डे आणि टी-२० या दोन्ही फॉरमॅटचे जागतिक विजेतेपद आपल्याकडे राखण्यावर असेल. भारताकडे रेणुका सिंग, क्रांती गौड यांसारखे वेगवान गोलंदाज आणि दीप्ती शर्मासारखे अनुभवी अष्टपैलू खेळाडू असल्याने संघाची बाजू मजबूत मानली जात आहे. या स्पर्धेची अंतिम लढत ५ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवली जाईल.