"आमच्या संघात अपयशाला अजिबात स्थान नाही": झिम्बाब्वे मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरचे रोखठोक विधान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर.

 

हरारे

इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने खेळाडूंना अपयशाच्या भीतीशिवाय आणि निडरपणे क्रिकेट खेळण्याचे आवाहन केले आहे. अलीकडील पराभवांमुळे संघ आणखी जवळ आला असून आगामी सामन्यांसाठी संघाने रणनैतिक तयारी केल्याचे त्याने म्हटले आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावर प्रथमच आलेला कर्णधार अय्यर म्हणाला की, कमी वेळेत तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे हे संघापुढील मुख्य आव्हान असेल. आमच्यातील काही खेळाडू इथे पहिल्यांदाच खेळत आहेत, त्यामुळे जितक्या लवकर परिस्थितीशी जुळवून घेऊ, तितके चांगले निकाल मिळतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

पराभवातून शिकून पुढे जाण्याची वेळ

इंग्लंडमधील कठीण मालिकेनंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, "आमचा इंग्लंडमध्ये खडतर काळ गेला, परंतु त्यातून अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या. एक संघ म्हणून आपल्याला भविष्यात काय घडवायचे आहे, मैदानात उतरल्यावर कोणत्या मानसिकतेची आणि जागरूकतेची गरज असते, याची जाणीव आम्हाला झाली आहे."

युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना तो म्हणाला की, खेळाडूंनी अपयशाच्या भीतीने खेळू नये. जेव्हा मनात अशी भीती असते, तेव्हा खेळाडू स्वतःचा बचाव करण्यासाठी खेळतो. मात्र, भीती नसताना खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. बाहेर लोक काय बोलत आहेत याचा फारसा विचार न करता वर्तमानात जगणे गरजेचे आहे, असे सांगत संघाने एकत्रितपणे चांगली कामगिरी केल्यास निश्चितच यश मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.