नवी दिल्ली
भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय पुरुष संघ जपानविरुद्ध त्यांचा पहिलावहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पार्श्वभूमीवर हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, २२ सप्टेंबर रोजी जपानमधील साणो येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हा ऐतिहासिक मुकाबला रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ 'सुझुकी कप'साठी आपसात भिडणार आहेत.
जपानच्या साणो शहरात होणारा हा सामना 'स्पोर्ट ७५' या उपक्रमाचा एक भाग आहे, ज्याची सुरुवात जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शिखर परिषदेदरम्यान झालेल्या करारानुसार झाली आहे. या सामन्याचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार असून, उपकर्णधारपदाची धुरा तिलक वर्मा सांभाळणार आहे. याशिवाय संजू सॅमसन आणि युवा स्टार वैभव सूर्यवंशी हे देखील भारतीय संघात महत्त्वाचे खेळाडू म्हणून सहभागी होणार आहेत.
हाँगझोंग येथील मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळताना दिसेल, जी २८ सप्टेंबरपासून सुरू होईल. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, जगातील सर्वात मोठे क्रिकेट मंडळ म्हणून क्रिकेटचा प्रसार पारंपारिक देशांच्या पलीकडे नेण्याची आमची जबाबदारी आहे. या ऐतिहासिक सामन्यामुळे जपान आणि पूर्व आशियामध्ये क्रिकेटचा विस्तार होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जपान क्रिकेट असोसिएशनचे सीईओ नाओकी मियाजी यांनीही या ऐतिहासिक प्रसंगाबद्दल आनंद व्यक्त करत भारतीय संघाचे स्वागत केले आहे.