मोहकी (चीन)
मोठी कामगिरी करत भारतीय महिला हॉकी संघाने एएचएफ ज्युनियर आशिया कपच्या (AHF Junior Asia Cup) एलिट पूल सामन्यात मलेशियाचा ११-१ असा दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने गुणतक्त्यात आपले पहिले स्थान अधिक मजबूत केले आहे. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करून विजयी सुरुवात केली होती. मलेशियाविरुद्धच्या या सामन्यात भारताच्या तब्बल सात वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल करत चमकदार कामगिरी केली.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत मलेशियावर दबाव निर्माण केला. भारताने या सामन्यात ४ मैदानी गोल, ५ पेनल्टी कॉर्नर आणि २ पेनल्टी स्ट्रोकच्या मदतीने एकूण ११ गोल नोंदवले. पहिल्याच मिनिटाला पूजा साहूने पेनल्टी स्ट्रोकद्वारे भारताचे खाते उघडले, तर चौथ्या मिनिटाला पूर्णिमा यादवने गोल करत आघाडी दुप्पट केली. यानंतर बिनिमा धन आणि कृष्णा शर्मा यांनीही गोल करत पहिल्या क्वार्टरमध्येच भारताची पकड मजबूत केली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये पूर्णिमा यादवने तिचा दुसरा गोल नोंदवला, तर सुखवीर कौर आणि गीता यादव यांनीही गोल करत हाफ टाईमपर्यंत भारताला ७-० अशी अजेय आघाडी मिळवून दिली. मलेशियाने ३८ व्या मिनिटाला नूर मोहम्मदच्या गोलद्वारे खाते उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या आक्रमक खेळापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर पूजा साहू, सानिका चंद्रकांत माने आणि गीता यादव यांनी पुन्हा गोल करत भारताचा विजय ११-१ ने निश्चित केला. या सलग दोन विजयांसह भारताचे ६ गुण झाले असून, संघ एलिट पूलमध्ये शीर्षस्थानी आहे. भारताचा पुढील सामना ८ सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध होणार आहे.