आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला, पण या विजयाला पहिलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावाची किनार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाला "खेळाच्या मैदानातील ऑपरेशन सिंदूर" म्हटले, तर दुसरीकडे भारतीय संघाने पाकिस्तानचे गृहमंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून चषक स्वीकारण्यास नकार दिला.
टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले. 'X' वरील आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, "#OperationSindoor खेळाच्या मैदानावर. निकाल तोच आहे - भारत जिंकला! आमच्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन."
#OperationSindoor on the games field.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2025
Outcome is the same - India wins!
Congrats to our cricketers.
बीसीसीआयचा आक्रमक पवित्रा
सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात, पाकिस्तानने उपविजेतेपदाची पदके स्वीकारली. भारताकडून 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेला टिळक वर्मा आणि 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरलेला अभिषेक शर्मा यांनीही आपले वैयक्तिक पुरस्कार स्वीकारले.
मात्र, भारतीय संघाने विजेतेपदाचा चषक आणि पदके स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि निवेदक सायमन डुल यांनी जाहीर केले की, भारतीय संघ आपले पुरस्कार स्वीकारणार नाही आणि बक्षीस वितरण सोहळा संपल्याचे घोषित केले.
यावर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मुंबईतून 'एएनआय'ला सांगितले की, "जो देश आमच्या देशाविरुद्ध युद्ध पुकारत आहे, त्या देशाच्या प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या हातून आम्ही चषक स्वीकारू शकत नाही." त्यांनी सांगितले की, "आम्ही आशिया चषक २०२५ चा चषक ACC अध्यक्षांकडून न घेण्याचा निर्णय घेतला होता, जे पाकिस्तानच्या मुख्य नेत्यांपैकी एक आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती ट्रॉफी आणि पदके आपल्यासोबत घेऊन जाईल. हे अत्यंत दुर्दैवी आणि खेळभावनेला धरून नाही."
नोव्हेंबरमध्ये दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत, मोहसीन नक्वी यांच्या या वर्तनाविरोधात "अत्यंत तीव्र आणि कठोर" निषेध नोंदवला जाईल, असेही सैकिया यांनी सांगितले.
मैदानावर जल्लोष, पण ट्रॉफीशिवाय
पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकूनही, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण भारतीय संघाने मैदानावर आपला विजय साजरा केला. सूर्यकुमारने माजी कर्णधार रोहित शर्माच्या टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतरच्या 'स्लो-वॉक' सेलिब्रेशनची नक्कल केली आणि संपूर्ण संघाने कॅमेऱ्यासमोर पोज दिले.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने एक मोठी घोषणा करत, आशिया चषकातील आपली संपूर्ण मॅच फी भारतीय लष्कराला दान करणार असल्याचे जाहीर केले.
Hats off to @surya_14kumar 🫡
— Yo Yo Funny Singh (@moronhumor) September 28, 2025
Donates his 7 Match Fees ie. entire Asia Cup to @adgpi 👏🏻👏🏻
Jai Hind 🇮🇳 pic.twitter.com/hsC9t3FSKV
सामन्याचा आढावा
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. साहिबजादा फरहान (५७) आणि फखर जमान (४६) यांच्या ८४ धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला चांगली सुरुवात मिळाली. तथापि, मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू कुलदीप यादव (४/३०) आणि वरुण चक्रवर्ती (२/३०) यांच्या जादुई गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा डाव गडगडला आणि तो १९.१ षटकांत १४६ धावांवरच संपुष्टात आला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना, फहीम अश्रफच्या (३/२९) भेदक गोलंदाजीमुळे भारताची अवस्था २० धावांवर ३ गडी बाद अशी झाली होती. पण त्यानंतर, टिळक वर्माने (नाबाद ६९) आणि संजू सॅमसनने (२४) ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारताला संकटातून बाहेर काढले. शिवम दुबेच्या (३३) फटकेबाजीने भारताचा विजय निश्चित केला आणि अखेरीस, आपला पहिलाच आशिया चषक सामना खेळणाऱ्या रिंकू सिंगने विजयी धाव घेतली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page