आठ वर्षांचा दुष्काळ संपला! भारताने आशिया चषक जिंकला, विश्वचषकात थेट प्रवेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी राजगीर हॉकी स्टेडियमवर आशिया चषक २०२५ चे विजेतेपद जिंकून संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला. अंतिम सामन्यात गतविजेत्या दक्षिण कोरियाचा ४-१ असा धुव्वा उडवत, टीम इंडियाने केवळ आठ वर्षांनंतर आशिया चषकावर आपले नाव कोरले नाही, तर थेट 'एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६' साठीही आपले स्थान निश्चित केले.

या शानदार कामगिरीनंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने संघाच्या फॉरवर्ड लाइनचे तोंडभरून कौतुक केले आणि सांगितले की, "आता जगासाठी सर्वोत्तम संघ तयार करणे हे आमचे लक्ष्य आहे." तसेच, त्याने पंजाबमधील पूरग्रस्तांप्रति संघाच्या संवेदना व्यक्त केल्या आणि या कठीण काळात खेळाडू लोकांच्या पाठीशी उभे राहतील, असे वचन दिले.

भारताने सामन्याची सुरुवात धमाकेदार केली. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला सुखजीत सिंगने कर्णधार हरमनप्रीतच्या पासवर शानदार गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर, सामन्याच्या २८ व्या आणि ४५ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने दोन उत्कृष्ट गोल करून प्रतिस्पर्धी संघाच्या आशांवर पाणी फेरले. अमित रोहिदासने ५० व्या मिनिटाला गोल करून भारताचा विजय निश्चित केला.

ही जीत यासाठीही खास आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून भारतीय हॉकी संघ कठीण काळातून जात होता. जूनमध्ये झालेल्या एफआयएच प्रो लीगमध्ये भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती आणि संघ नऊ संघांमध्ये आठव्या स्थानावर होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारताला १-३ ने पराभव पत्करावा लागला होता. अशा निराशाजनक कामगिरीनंतर आशिया चषक जिंकल्याने संघाच्या आत्मविश्वासाला आणि भविष्याला नवी ताकद मिळाली आहे.

सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला, "संघ बऱ्याच काळापासून या विजेतेपदासाठी मेहनत करत होता. आमच्या बचावाने शानदार खेळ दाखवला आणि फॉरवर्ड खेळाडूंनी संधीचे सोने केले. हा विजय आमच्या मेहनतीचे फळ आहे." त्याने पंजाबमधील पुरावरही चिंता व्यक्त केली आणि म्हटले, "ही अत्यंत दुःखद परिस्थिती आहे. आम्ही लोकांच्या पाठीशी उभे राहू. माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन मदत करावी."

या स्पर्धेत भारताने हळूहळू आपली लय पकडली. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संयम आणि आक्रमकतेची कमतरता दिसली, पण सुपर फोर आणि अंतिम सामन्यात संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. कर्णधार हरमनप्रीत अनेकदा 'प्लेमेकर'च्या भूमिकेत दिसला आणि दिलप्रीत सिंग संपूर्ण सामन्याचा स्टार ठरला.

प्रशिक्षक क्रेग फुल्टनही या विजयाने भारावून गेले होते. ते म्हणाले, "सुरुवातीला संघाची कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती, पण जसजशी स्पर्धा पुढे गेली, तसतसे खेळाडूंनी शानदार सुधारणा दाखवली. आशिया चषक जिंकणे आणि थेट विश्वचषकासाठी पात्र ठरणे, ही मोठी दिलासादायक बाब आहे."

उपकर्णधार हार्दिक सिंगनेही या विजयाला संघाच्या सामूहिक भावनेचे श्रेय दिले. तो म्हणाला, "आशियामध्ये आपले वर्चस्व निर्माण करायचे, ही आमची मानसिकता होती. मागील अपयश आम्ही मागे सोडले आहे आणि हा विजय सर्वात सुखद अनुभव आहे."

हॉकी इंडियाने या विजयानिमित्त खेळाडूंना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला दीड लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेला हा विजय भारतीय हॉकीसाठी एका नव्या पहाटेचा संकेत आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter