पाकिस्तानचा यू-टर्न; भारताविरुद्धचा ट्वेन्टी-२० विश्वचषक सामना खेळण्यास सरकारने दिली मंजुरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा पेच अखेर सुटला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक सामन्यावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेत 'यू-टर्न' घेतला आहे. पाकिस्तान सरकारने सोमवारी राष्ट्रीय संघाला भारताविरुद्ध खेळण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असून नियोजित वेळापत्रकानुसार सामना खेळण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारच्या सूचनेनुसार भारताविरुद्धच्या सामन्यातून शेवटच्या क्षणी माघार घेतल्यास आयसीसीने पीसीबीला संभाव्य आर्थिक परिणामांची जाणीव करून दिली होती. पीसीबीने यासाठी फोर्स मॅजेर कलमाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला होता. हे कलम करारातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यापासून रोखणाऱ्या अनपेक्षित परिस्थितींसाठी लागू होते. मात्र आयसीसीच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आपली भूमिका बदलली आहे. 

"पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पीसीबी, आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) प्रतिनिधींमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेच्या निकालांबद्दल अधिकृत माहिती दिली आहे," असे पाकिस्तान सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. "पाकिस्तान सरकारने बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पीसीबीला केलेल्या औपचारिक विनंत्या, तसेच श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर सदस्य देशांकडून आलेल्या पत्रांचा आढावा घेतला आहे. या पत्रांद्वारे सध्याच्या आव्हानांवर व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानच्या नेतृत्वाची मागणी करण्यात आली होती."

निवेदनात पुढे म्हटले आहे की, "सरकारने बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीन उल इस्लाम यांच्या विधानाची दखल घेतली आहे. आपल्या बंधू देशाने व्यक्त केलेली कृतज्ञता आम्ही स्वीकारतो. पाकिस्तान बांगलादेशच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आज संध्याकाळी पंतप्रधानांनी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या मैत्रीपूर्ण संभाषणात त्यांनी आठवण करून दिली की, पाकिस्तान आणि श्रीलंका कठीण काळात नेहमीच एकमेकांच्या सोबत राहिले आहेत. श्रीलंकेच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांना सध्याचा पेच शांततेने सोडवण्याची विनंती केली होती."

"बहुपक्षीय चर्चेत झालेले सकारात्मक निर्णय आणि मित्र देशांच्या विनंतीचा विचार करून, पाकिस्तान सरकार याद्वारे राष्ट्रीय क्रिकेट संघाला १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयसीसी पुरुषांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील नियोजित सामन्यात मैदानात उतरण्याचे निर्देश देत आहे. याशिवाय, क्रिकेटची भावना जपणे आणि सर्व सहभागी राष्ट्रांमध्ये या जागतिक खेळाचे सातत्य राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे." 

पंतप्रधानांनी आणि पाकिस्तानच्या जनतेने 'मेन इन ग्रीन'ला शुभेच्छा दिल्या आहेत. आमचा संघ जागतिक विजेतेपदासाठी खेळताना खिलाडूवृत्ती आणि राष्ट्रीय अभिमान मैदानात टिकवून ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) म्हटले आहे की, ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन सुरळीत पार पडावे यासाठी पीसीबीसोबतचा संवाद एकता आणि सहभागाच्या वचनबद्धतेचा आदर करण्यावर केंद्रित होता. आयसीसीने बांगलादेश क्रिकेटला दीर्घकालीन पाठिंबा दर्शवला असून २०२६ च्या स्पर्धेत बांगलादेश संघ नसल्यामुळे देशातील खेळाच्या वाढीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.