तिरुपरनकुंद्रम टेकडीवरील प्राणी बळीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मद्रास उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय कायम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुपरनकुंद्रम टेकडीवर प्राणी बळी देण्यास मनाई करणारा आणि मुस्लिम भाविकांना प्रार्थनेचे मर्यादित अधिकार देणारा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवला. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने ऑक्टोबर २०२५ मधील उच्च न्यायालयाचा निकाल संतुलित असल्याचे सांगून त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या निकालामुळे धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा करणारी याचिका खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली होती.

सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या भागात कधीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचा युक्तिवाद केला. त्यावर भाष्य करताना खंडपीठाने स्पष्ट केले की, जर अशी चिंता नसती तर शांतता समितीची बैठक बोलावण्याची गरज पडली नसती. "हा आदेश अत्यंत संतुलित वाटतो. आम्ही या आदेशात हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रस्ताव ठेवत नाही. पक्षांच्या अधिकारांवर कोणतेही मत व्यक्त न करता आक्षेपार्ह आदेश कायम ठेवला जात आहे," असे खंडपीठाने नमूद केले.

मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी बकरी ईद आणि रमजान दरम्यान नेल्लीथोप भागात प्रार्थना आणि धार्मिक मेळाव्यांना परवानगी दिली होती. मात्र, सुब्रमणिया स्वामी मंदिराच्या पारंपारिक मार्गांना यामुळे कोणताही अडथळा येऊ नये, अशी अट घातली होती. त्याच वेळी या प्रकरणावर सक्षम दिवाणी न्यायालय अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत प्राणी बळी देणे, स्वयंपाक करणे आणि मांसाहारी अन्न नेणे किंवा वाढण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.