"भारतातील सुरक्षेवर पूर्ण विश्वास!"; नेतन्याहूंचा दौरा रद्द झाल्याच्या चर्चांना इस्रायलचा पूर्णविराम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 m ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा नियोजित भारत दौरा सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे, असे दावे करणारे मीडिया रिपोर्ट्स इस्रायलने मंगळवारी फेटाळून लावले आहेत. इस्रायलने स्पष्ट केले की, पंतप्रधान नेतन्याहूंचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेवर "पूर्ण विश्वास" आहे आणि दोन्ही बाजू दौऱ्यासाठी सोयीच्या नव्या तारखा निश्चित करत आहेत.

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, "इस्रायलचे भारताशी असलेले नाते आणि पंतप्रधान नेतन्याहू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बंध अत्यंत मजबूत आहेत."

"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारताच्या सुरक्षेवर पंतप्रधान नेतन्याहू यांचा पूर्ण विश्वास आहे आणि दोन्ही देशांची पथके दौऱ्याच्या नवीन तारखेसाठी समन्वय साधत आहेत," असे या निवेदनात पुढे म्हटले आहे.

काही इस्रायली प्रसारमाध्यमांनी यापूर्वी असे वृत्त दिले होते की, या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या (लाल किल्ला स्फोट) पार्श्वभूमीवर, नेतन्याहू यांनी सुरक्षेच्या चिंतेमुळे आपला दौरा पुढे ढकलला आहे. नेतन्याहू डिसेंबरमध्ये नवी दिल्लीला भेट देणार होते. २०१८ नंतरचा हा त्यांचा पहिलाच अधिकृत भारत दौरा असणार होता.

मात्र, येथील माहितगार सूत्रांनी 'पीटीआय'ला सांगितले की, हे अहवाल केवळ अंदाज आणि दिशाभूल करणारे आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही नेत्यांच्या सोयीनुसार परस्परांना मान्य होतील अशा तारखा निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.