युरोपात बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर.
"दहशतवादाकडे द्विपक्षीय मुद्दा नाही, तर जागतिक समस्या म्हणून पाहायला हवे," असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज बेल्जियममधील भारतीय समुदायासमोर बोलताना व्यक्त केले. जगात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा संबंध पाकिस्तानशी जोडता येतो, अशी टीका त्यांनी केली.
जयशंकर हे सध्या युरोपच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज येथील भारतीयांशी संवाद साधला. ते म्हणाले, "ब्रुसेल्समध्येही २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे दहशतवाद ही एखाद्या देशाची समस्या नाही. अनेकदा माध्यमेही दहशतवाद हा भारत-पाकिस्तानचा मुद्दा आहे, काश्मीरचा मुद्दा आहे असे सांगतात. मात्र, दहशतवादाकडे एक जागतिक समस्या म्हणूनच पाहावे लागेल. दहशतवादाला एखाद्या देशाचाच पाठिंबा असते, तेव्हा ती समस्या आणखी गंभीर होते. युरोपमध्येही दहशतवादी हल्ले झाले. मात्र, युरोपमधील कोणत्याही देशाने दहशतवादाचा धोरण म्हणून वापर केलेला नाही. त्यामुळे हा केवळ दोन देशांमधील किंवा भारताचा प्रश्न नाही. मागील तीस वर्षांचा दहशतवादाचा इतिहास पाहिला तर अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानात गेले आहेत."