श्रीलंका ते इंडोनेशिया, निसर्गाचा कोप! वादळ आणि पुरामुळे १००० जण ठार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 19 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आशिया खंडात निसर्गाने रौद्र रूप धारण केले आहे. तीन उष्णकटिबंधीय चक्रीवादळे (tropical cyclones) आणि ईशान्य मान्सूनचा पाऊस यांचा दुहेरी फटका बसल्याने आग्नेय आशिया आणि श्रीलंकेत महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये आतापर्यंत जवळपास १,००० लोकांचा बळी गेला आहे.

इंडोनेशिया आणि श्रीलंका या दोन देशांना या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात मान्सूनचा पाऊस नेहमीच पडतो, पण यावेळी एकाच वेळी तीन चक्रीवादळे धडकल्याने विनाशाची तीव्रता प्रचंड वाढली आहे.

इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये हाहाकार

इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर वादळामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. तीव्र वादळी वाऱ्यांमुळे आणि पुरामुळे तिथे किमान ४४२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४०२ जण अद्याप बेपत्ता आहेत. 'सेन्यार' (Senyar) नावाच्या वादळाने मलाक्काच्या सामुद्रधुनीत धुमाकूळ घातला होता. हाँगकाँग वेधशाळेनुसार, हे वादळ आता दक्षिण चीन समुद्रात शमले आहे.

दुसरीकडे, थायलंडमध्येही मृतांचा आकडा वाढला असून तो १६९ वर पोहोचला आहे. अमेरिकेच्या हवामान अंदाज केंद्राच्या माहितीनुसार, द्वीपकल्पीय मलेशिया आणि दक्षिण थायलंडमध्ये गेल्या आठवड्यात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला आहे.

श्रीलंकेत परिस्थिती बिकट

श्रीलंकेत रविवारपर्यंत पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वेगाने वाढली. हा आकडा जवळपास दुप्पट होऊन ३३४ वर पोहोचला आहे, तर ३७० जण बेपत्ता आहेत. शुक्रवारी 'दितवाह' (Ditwah) चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

भारताला धोक्याचा इशारा

श्रीलंकेला तडाखा दिल्यानंतर 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम भारतावरही दिसून येणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये या वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.