आबिद आझाद : गांधीवादी बँकर बनलाय भुकेल्यांचा अन्नदाता

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 6 d ago
आबिद आझाद
आबिद आझाद

 

‘भुकेल्यांसाठी अन्न हाच देव आहे’,असं राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे. कारण भुकेलेल्या व्यक्ती अन्न हेच सत्य आणि देवाचं प्रतीक आहे. आसाममधील युवा बँक व्यावसायिक आबिद आझाद गांधीजींच्या या विचारांचे खरे अनुयायी आहेत. गुवाहाटीच्या रस्त्यांवर, फुटपाथवर, रुग्णालयात हजारो लोक आबिद यांना बँकेत पैसे मिळवण्यासाठी नव्हे, तर स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्न मिळवण्यासाठी भेटतात.

कोविड-१९ मधून जन्मलेला संकल्प
२०२० मध्ये कोविड-१९ महामारी आणि लॉकडाउनमुळे जग ठप्प झालं. या संकटात आबिद यांनी आसामच्या राजधानी गुवाहाटीत गरजूंना अन्न पुरवण्याचा निर्णय घेतला. “लॉकडाउनमुळे दुकानं, हॉटेल बंद झाली. गौहाटी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात (जीएमसीएच) दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना, विशेषतः गरीब कुटुंबांना अन्न मिळणं कठीण झालं होतं.” अशी आठवण आबिद यांनी 'आवाज द व्हॉइस'ला सांगितली.

या संकटात आबिद यांचा प्रवासही सोपा नव्हता. आजाराने त्यांच्या जवळच्या मित्रांचे प्राण घेतले. त्यांनी अनेकांनी कठीण प्रसंगांना तोंड दिलं. मात्र हार मानली नाही. मित्रांनी एकत्र येऊन गरजूंना अन्न पुरवण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच 'रेनड्रॉप्स इनिशिएटिव्ह असम' या स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला. “आम्ही कोविडग्रस्त कुटुंबांना घरोघरी जेवण बनवून पोहोचवायचो. गरज वाढल्याने जीएमसीएच परिसरात शेकडोजणांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागांतून आलेल्यांना आम्ही जेवण पुरवायला सुरुवात केली” असं आबिद सांगतात.

पुढे कोरोना संपल्यावर लॉकडाउन हटवलं गेलं आणि जीवन पूर्वपदावर यायला लागलं. मात्र आबिद आझाद आणि रेनड्रॉप्स इनिशिएटिव्ह असमच्या टीमला लक्षात आलं की अनेक कुटुंबांना, विशेषतः वैद्यकीय खर्चामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी जीएमसीएच परिसरात दररोज संध्याकाळी जेवण वाटप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

रमजानमधील विशेष सेवा
महामारी कमी झाल्यावरही वैद्यकीय खर्चामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी आबिद आणि रेनड्रॉप्स इनिशिएटिव्ह असमच्या टीमने दररोज संध्याकाळी जीएमसीएच परिसरात जेवण वाटप सुरू ठेवलं. रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांनी आणखी पुढचं पाऊल टाकलं. “जीएमसीएचमध्ये उपवास करणाऱ्यांसाठी सेहरी (पहाटेचं जेवण) आणि इफ्तार (संध्याकाळचं जेवण) उपलब्ध नव्हतं. आम्ही ही जबाबदारी घेतली. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून सेहरी आणि इफ्तार वाटतो. सार्वजनिक ठिकाणी वाटप असल्याने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सर्वांनासाठी हे अन्न मोफत असतं. हा अनुभव खूप समाधान देणारा असतो,” असं आबिद म्हणतात. २०२५ च्या रमजानमध्ये एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा आबिद यांनी सेहरी आणि इफ्तार वाटलं नाही.

आव्हानं आणि समर्पण
रेनड्रॉप्स इनिशिएटिव्हचं सर्वात मोठं आव्हान आहे निधी उभारणी. सध्या क्राउड-फंडिंगद्वारे निधी जमा होतो. अनेकजण वाढदिवस, वर्धापनदिन किंवा प्रियजनांच्या स्मरणार्थ जेवण प्रायोजित करतात. “कधी निधी कमी पडतो, तेव्हा आम्ही स्वतःच्या खिशातून खर्च करतो. कठीण काळात तर लग्न समारंभातून उरलेलं अन्न रात्री उशिरा गोळा करून आम्ही ते दुसऱ्या दिवशी वाटलं.” अशी आठवणआबिद सांगतात. मात्र या आव्हानांनी त्यांचा संकल्प डगमगला नाही. “या प्रवासानेच आम्हाला जीवनाचा उद्देश आणि आत्मिक शांती दिली.” असं ते समाधानाने सांगतात.

आबिद यांची टीममध्ये व्यावसायिक, उद्योजक आणि निवृत्त व्यक्ती आहेत. ही मंडळी या कार्यासाठी वेळ आणि श्रमाद्वारे योगदान देतात. आसामभरातील हजारो शुभचिंतक आर्थिक मदत करतात, संसाधने पुरवतात, आणि नैतिक पाठबळही देतात.

जीएमसीएचमध्ये रुग्णासोबत आलेले मतीऊर रहमान म्हणाले, “रमजानच्या १०व्या दिवशी रात्री २:३० वाजता मला आबिद यांच्या टीमकडून सेहरी मिळाली. इफ्तारही येथे मिळालं. रमजानच्या १०व्या दिवसापासून मी येथेच सेहरी आणि इफ्तार करतो.”

इथेच रूग्णासोबत आलेल्या मूनू गोगोई म्हणाल्या, “एके रात्री १ वाजता आम्ही रुग्णासोबत इथे आलो. आम्हाला प्रचंड भूक लागली होती, मात्र आजूबाजूला काही खाण्याची सोय नव्हती. रेनड्रॉप्सच्या जेवणाने माझी भूक भागली.”

अन्नापलीकडील सामाजिक कार्य
रेनड्रॉप्स इनिशिएटिव्ह असम अन्न वाटपापुरतं मर्यादित नाही. “जीएमसीएचमध्ये अनेक रुग्णांना महागडी औषधं घ्यावी लागतात. काही रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांची औषधं वापरात न येता पडून राहतात. आम्ही मृत रुग्णांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून ती औषधं डॉक्टरांना आणून देतो, आणि मग ती औषधे गरीब रुग्णांना मोफत दिली जातात.” असं आबिद सांगतात.

याशिवाय, रेनड्रॉप्सने आसामभर वृक्षारोपण मोहीम सुरू केली. क्राउड-फंडिंगद्वारे लोकांना आई-वडील, शिक्षक, मुलं किंवा मित्रांसाठी झाडं भेट देण्यास प्रोत्साहन दिलं. “आम्ही शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरात हजारो झाडं लावली. त्यांची देखभालही करतो,” असं आबिद म्हणतात. नवे लोक या उपक्रमात सामील होत आहेत आणि सोबत नव्या कल्पना आणत आहेत.

प्रेरणादायी प्रवासाला सलाम
गुवाहाटीसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात, जिथे गरीब आणि भुकेल्यांकडे पाहण्यासही कुणाकडे वेळ नाही, अशा परीस्थित आबिद आझाद आणि रेनड्रॉप्स इनिशिएटिव्ह असम वंचितांसाठी आशेचा किरण ठरले आहेत. 

- दौलत रहमान 
(लेखक आवाज द व्हॉइस-आसामचे संपादक आहेत.)