नवाबजादा मोहम्मद आसिफ अली : अर्काट घराण्याच्या वैभवाला सामाजिक बांधिलकीची जोड देणारा राजपुत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
नवाबजादा मोहम्मद आसिफ अली
नवाबजादा मोहम्मद आसिफ अली

 

श्रीलता एम.

राजपुत्र किंवा नवाब म्हटलं की आपल्याला राजकन्या आणि परीकथा आठवतात. पण खऱ्या आयुष्यात हे राजपुत्र जर माणुसकी जपणारे असतील, तर त्या कथा अधिकच सुंदर होतात. आज आपण अशाच एका राजपुत्राबद्दल जाणून घेणार आहोत, जे केवळ दानशूरपणा आणि दयेचे प्रतीक नाहीत, तर त्यांच्या अवतीभोवती नेहमीच संगीताचे सूर गुंजत असतात.

आपण अर्काटच्या राजपुत्राबद्दल ऐकले आहे का? त्यांचे नाव आहे नवाबजादा मोहम्मद आसिफ अली. ते अर्काटचे नवाब मोहम्मद अब्दुल अली यांचे सुपुत्र आहेत. चेन्नईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात या घराण्याचे स्थान अत्यंत आदराचे आणि महत्त्वाचे आहे. त्यांचे निवासस्थान असलेला 'आमीर महाल' हा 'आरकोट फाउंडेशन'च्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक मानवतावादी उपक्रमांचे मुख्य केंद्र आहे.

सध्याचे नवाब मोहम्मद अब्दुल अली यांच्याबद्दल सर्वांनाच आपुलकी आहे, पण रोजच्या धावपळीत लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम त्यांचे पुत्र आसिफ अली समर्थपणे सांभाळत आहेत. मग ते मदतीचे उपक्रम असोत, सर्वधर्मीय कार्यक्रम असोत किंवा इतर सामाजिक कार्य, नवाबजादा आसिफ अली यांचा पुढाकार त्यात मोठा असतो. गरिबांना मदत करताना ते कधीही धर्माचा विचार करत नाहीत.

एकूणच या घराण्याचे सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून आसिफ अली समोर आले आहेत. धार्मिक नेत्यांशी स्नेहसंबंध राखणे, समाजातील विविध कार्यक्रमांत सहभागी होणे आणि इतर समुदायांच्या नेत्यांशी संपर्क ठेवणे यात ते आघाडीवर असतात. मात्र, या सामाजिक कामासोबतच त्यांच्या महालाच्या दारातून बाहेर पडणाऱ्या सुरेल संगीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नवाबजादा आसिफ अली यांनी 'रास्ते' नावाचा एक संगीत अल्बम तयार केला, जो त्यांच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का होता. या अल्बमचे प्रकाशन खुद्द सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी केले. आसिफ अली रहमान यांचा खूप आदर करतात. 'रास्ते' या गाण्याबद्दल बोलताना ते म्हणतात की, हे गाणे अर्काट घराण्याच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. विविध मार्ग असले तरी ते शेवटी एकाच ध्येयाकडे नेतात, हा संदेश या गाण्यातून दिला आहे. "प्रत्येकाचे मार्ग वेगळे असू शकतात, पण कोणताही रस्ता दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो," असे ते मानतात.

हे गाणे मनाला शांती देणारे आणि उभारी देणारे असून त्याचे चित्रीकरण मध्यपूर्वेतील वाळवंटात करण्यात आले आहे. नवाबजादा आसिफ अली हे अर्काटच्या नवाबांचे 'दिवाण' म्हणूनही काम पाहतात. या गाण्याच्या जन्माची कथा सांगताना ते म्हणतात की, एका सकाळी पियानो वाजवत असताना त्यांना एक सुंदर धून सुचली. "मी नेहमीच गाणी तयार करतो आणि ती लायब्ररीतील हार्ड डिस्कमध्ये जपून ठेवतो, पण या धूनबद्दल मला काहीतरी वेगळे वाटले आणि त्यातून 'रास्ते' जन्मले."

त्यांनी या गाण्याचे शब्द स्वतः लिहिले आहेत. "हे रस्ते मला कुठे घेऊन आले आहेत, याचे मला आश्चर्य वाटते... ते मला ध्येयाचे संकेत देत आहेत... मला आभाळाला स्पर्श करावासा वाटतोय... मला या वाटेवर चालायचे आहे, माझे ध्येय शोधायचे आहे आणि हा प्रवास पूर्ण करण्याचे धाडस मिळवायचे आहे..." अशा या ओळी आहेत. हे गाणे तयार झाल्यावर त्यांनी ए. आर. रहमान यांना ते लाँच करण्याची विनंती केली. आरकोट फाउंडेशन ज्या विचाराने काम करते, त्याच विचारातून हे गाणे स्फुरले असल्याचे ते सांगतात.

नवाबजादा आसिफ अली यांच्या व्यक्तिमत्त्वात संगीत हे बालपणापासूनच भिनलेले आहे. त्यांनी सुप्रसिद्ध गायक लकी अली यांच्यासोबतही काम केले आहे, जे त्यांचे नातेवाईकही आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी संगीतबद्ध केलेले एक गाणे दिवंगत महान गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायले आहे. हे गाणे दक्षिण आफ्रिकेतील तमिळ लोकांसाठी बनवलेल्या एका चित्रपटात वापरण्यात आले होते. त्यांचे इतरही अनेक संगीत प्रकल्प दक्षिण आफ्रिकेतील तमिळ चित्रपटांचा भाग आहेत.

इतिहासाचा विचार केला तर अर्काट हे वेल्लोर जवळील एक छोटे शहर आहे. १७ व्या शतकात औरंगजेबाने जेव्हा तिथे आपले प्रतिनिधी पाठवले, तेव्हा तो संपूर्ण प्रदेश 'कर्नाटक विभाग' म्हणून ओळखला जायचा, ज्यामध्ये आजचा तामिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग येतो. १६९२ मध्ये औरंगजेबाने झुलफिकर खान याला कर्नाटकचा पहिला सुभेदार म्हणून नियुक्त केले होते. पुढे दिल्लीतील मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाल्यावर अर्काट हे एक स्वतंत्र संस्थान बनले. कालांतराने सत्तांतरं झाली, पण अर्काटच्या नवाबांनी स्वतंत्र भारतात जो सन्मान मिळवला आहे, तो त्यांच्या सत्तेमुळे नाही, तर त्यांच्या निधर्मी आणि मध्यममार्गी भूमिकेमुळे मिळाला आहे.

आजच्या काळात आसिफ अली यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे काम जरी शांत वाटत असले, तरी त्याचा प्रभाव खूप खोल आहे. ते समाजातील विविध घटकांना एकत्र जोडण्याचे, संवादाचे मार्ग खुले ठेवण्याचे आणि सत्तेपेक्षा माणुसकीला महत्त्व देण्याचे काम करत आहेत. समाजात फूट पाडणे सोपे असते, पण लोकांना प्रेमाने एकत्र विणणे कठीण असते. हेच काम नवाबजादा आसिफ अली सातत्याने करत आहेत, म्हणूनच ते एक खरे 'चेंजमेकर' ठरतात. आमीर महालातून येणारे हे संगीताचे सूर आणि प्रगतीचा विचार राजेपणाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter