दानिश अली
जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील चिनाब खोऱ्यात मोहम्मद हफीझ फुरकानाबादी यांनी त्यांच्या कृतींनी, ज्ञानाने समरसतेचा दीप प्रज्वलित केला आहे. हफीझ यांचा जन्म डोडा शहराच्या नजीक एका गावात २ डिसेंबर १९६२ मध्ये झाला. त्यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ शिक्षण आणि करुणेच्या माध्यमातून समाजातील, लोकांमधील दारी कमी करून त्यांना आपापसात जोडण्याचे काम केले आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८९ मध्ये अरबी विषयात हफीझ यांनी त्यांचे मास्टर्स पूर्ण केले. पुढे त्यांनी डोडा येथील रॉयल अकादमी येथे शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली. विद्यार्थ्यांना अरबी, उर्दू आणि इंग्रजी भाषेचे धडे देतानाच त्यांनी शिक्षणाला जीवनाचा उद्देश मानलं. त्यानुसारचं त्यांनी डोडातील अनेक खासगी शाळांमध्ये अध्यापन केलं. १५ जून १९९५ ला त्यांची सरकारी शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. डोडा येथील हांच हायस्कूल येथे सरकारी शिक्षक म्हणून त्यांनी अरबी, उर्दू आणि इंग्रजी शिकवलं. पण वर्गात मुलींची उपस्थिती कमी होती. परंपराग्रस्त मानसिकतेमुळे मुलींना घरात ठेवलं जायचं. हफीझ यांनी याला आव्हान मानलं आणि डोडातील गावांमध्ये फिरून पालकांना मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. “शिक्षण हा हक्कच नाही, तर प्रकाश आहे,” असं ते सांगायचे. त्यांच्या प्रयत्नांनी मानसिकता बदलली, आणि मुली शाळेत येऊ लागल्या. ही त्यांनी केलेली पहिली क्रांती होती.

हफीझ यांचं कार्य एका वर्गापुरतं किंवा शाळेपुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांनी मित्रांसोबत डोडात चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केलं. यामागचा उद्देश जात धर्म न बघता परिसरातील गरीब आणि वंचित मुलांना शिक्षण देणं आहे.या ट्रस्टमार्फत मोफत शिक्षण, गणवेश, शूज आणि पुस्तकं पुरवली जातात. आज हफीझ यांचं घर मोफत ट्यूशन केंद्र बनलं. त्यांच्या घरी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना शिक्षण मिळत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत २०११ मध्ये जम्मू-काश्मीर सरकारने त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केल होतं.
हफीझ यांचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी त्यांचं समर्पण. धार्मिक तणावांनी ग्रासलेल्या डोडात त्यांनी समरसतेचा संदेश रुजवला आहे. याविषयी आता सरकारी अधिकारी असलेला त्यांचा माजी विद्यार्थी म्हणतो, "हफीझ सर आधी मानवता शिकवतात." सर्वसमावेशक कृतींमुळे आज त्यांना सर्व समुदायांमध्ये आदर मिळत आहे. लोक त्यांचे तोंडभरून कौतुक करतात.
शिक्षणाबरोबरच हफीझ लेखक आणि कवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘तन्झील’, ‘मोमिन की नमाज’ आणि ‘इंतेखाब’ पुस्तकांना जम्मू-काश्मीरमध्ये साहित्यिक आणि आध्यात्मिक मूल्यांसाठी मान मिळाला आहे. त्यांच्या कविता जसे,
ऐ खुदा हम बे-कासन को ईशान ईशान दे,
इलाही तेरे ही करम का सहारा,
ऐ खुदा हम को तेरा सहारा मिले,
तारीफ़ उस ख़ुदा की.
जम्मू-काश्मीरमधील शाळांच्या प्रभातफेरीत म्हटल्या जातात. या कविता त्यांच्या आध्यात्मिक आणि मानवीय मूल्यांचं प्रतिबिंब आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये हफीझ सरकारी सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभाला शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिकांनी हजेरी लावली होती. या सर्वांनी हफीझ यांच्या कार्याच्या प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. निवृत्तीनंतरही हफीझ शिकवत आहेत. समुपदेशन करत तरुणांना प्रेरणा देत आहेत. “खरी निवृत्ती तेव्हाच, जेव्हा समाजासाठी योगदान थांबतं,” असं त्यांचं मत आहे.