दानिश अली
श्रीनगरच्या एका शहरात सफा कदालच्या गजबजलेल्या गल्लीत अशांततेचा आवाज अनेकदा मुलांच्या हास्याला दाबतो. याच ठिकाणी एक तरुणी उभी राहते आणि तिच्या स्वप्नांना मोठ्या जिद्दीने पूर्ण करते. या तरुणीचे नाव इर्तिका अय्यूब. इर्तिकाने पुरुषांचं वर्चस्व असलेल्या रग्बी खेळात आपलं नाव उज्ज्वल केलं आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीचं काश्मीरमधली मुलगी आहे. २८ वर्षांची इर्तिका जम्मू-काश्मीरची सर्वात तरुण रग्बी डेव्हलपमेंट ऑफिसर (RDO) आहे. ती फक्त एक कोच नाही, तर शेकडो मुला-मुलींसाठी मार्गदर्शक आणि आदर्श आहे. पण तिचा हा प्रवास रग्बीसारखाच अतिशय खडतर होता.
रग्बीची सुरुवात
इर्तिकाला रग्बी खेळाविषयी माहिती मिळाली तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. कोठी बाग हायर सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तिला रग्बीचं बॉल ही माहीत नव्हता. ती म्हणते, “सुरुवातीला मला या खेळाची भीती वाटली. मला खेळ, नियम, काहीच कळत नव्हतं. पण माझ्या कोचनं मला खेळायला सांगितलं. एका आठवड्यातच माझी भीती संपली.” आता तिला हा खेळ आवडायला लागला होता. रग्बीची तीव्रता, शारीरिकता आणि उत्साह तिला भावला. गल्लीत मुलांसोबत फुटबॉल खेळणारी इर्तिका रग्बीत रमत होती.
पण रग्बी खेळणं म्हणजे समाजाच्या आणि कुटुंबाच्या विरोधाला तोंड देणं होतं. याविषयी ती म्हणते, “माझ्या कुटुंबाला मुलींचं एकटं खेळायला जाणं मान्य नव्हतं. त्यामुळे मी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा गमावल्या. पण मी हार मानली नाही. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं. माझ्या जिद्दीनं आणि प्रयत्नाने घरच्यांची मनं बदलली. आज माझे वडील मला शेकडो मुलांना शिकवताना पाहतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अभिमान दिसतो. याचा मला आनंद आहे.”
खेळाडूपासून कोचपर्यंतचा प्रवास
दोन वर्षांपूर्वी इर्तिकानं खेळाडूपासून कोच बनण्याचा निर्णय घेतला. ती काश्मीरमधल्या शाळा, कॉलेज आणि खासगी ट्यूशन सेंटरमध्ये रग्बी घेऊन गेली. रग्बी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून तिनं नव्या खेळाडूंना रग्बी शिकवलं आणि मुलींचा एक ग्रुप तयार केला. या मुलींना ती कशीही परिस्थिती असली तरीही श्रीनगरच्या गिंदुन स्टेडियम राजबाग येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत मुलांना प्रशिक्षण देते. ती म्हणते, “हे फक्त मैदान राहिलं नाही तर माझं दुसरं घर झालंय.”
इर्तिकानं राज्यस्तरावर सात सुवर्ण, जिल्हास्तरावर सात सुवर्ण आणि २०१६-१७ मध्ये रग्बी ७’स मध्ये रौप्य पदकं जिंकली आहेत. पण ती इतर खेळाडूंना प्रेरणा देण्यात तिचं खर यश मानते. कोच बनल्यानंतर तिनं स्वतःचं रग्बी क्लब सुरू केलं. या क्लबमध्ये ती मुलींना भारतासाठी खेळण्याचं स्वप्न दाखवते. याठिकानच्या काही मुलींनी भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण केलंय.
सफा कदालसारख्या परंपरावादी भागात मुलींचं खेळाच्या कपड्यात बाहेर पडणं अजूनही असामान्य गोष्ट आहे. यामुळे इर्तिकाला समाजातून होणाऱ्या टीकेला सामोरं जावं लागतं. ती म्हणते, “मी स्कूटीवर किट घालून जाते, तेव्हा लोक माझ्या मागे बोलतात. पण मी माझ्या कामानं उत्तर देते.” रोज सकाळी धावणं, जिम करणं आणि मुलांनी कोचिंग देणं ही इर्तिकाची दिनचर्या आहे. या कामांसोबत ती सोशल मीडियावर तिचा प्रवास शेअर करते. सोशल मीडियानं लोकांना तिझी दुसरी बाजू दाखवली आहे असं ती म्हणते.
खेळात मुलींच्या यशासाठी कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा आहे असं इर्तिका सांगते. ती म्हणते, “मी ज्यांना कोचिंग देते त्या मुली खूप हुशार आहेत, पण त्यांचा खेळातील आणि सर्वांगीण विकास घरात त्यांना किती मोकळीक मिळते यावर अवलंबून आहे. खेळ हा संस्कृती किंवा सन्मानाला धोका नाही, तो सशक्तीकरणाचा मार्ग आहे ही गोष्ट पालकांनी समजून घेतली पाहिजे.”
अजूनही या खेळात मुलींना येण्यासाठी अनेक अडचणी आहेत. खेळासाठी आणि मुलींसाठी असणाऱ्या अडचणी लक्षात आणून देत ती म्हणते, “या खेळात मुलींना सरकारी पाठिंबा कमी आहे. पायाभूत सुविधा आणि संसाधनं पुरेशी नाहीत. आधी आमच्याकडे सरावासाठी मैदानही नव्हतं. पण जम्मू-काश्मीर क्रीडा परिषद आणि रग्बी असोसिएशनच्या प्रयत्नांनी श्रीनगरात रग्बी होम पोलो मैदान मिळालं. आता आम्ही मोठ्या स्पर्धांपूर्वी महिनोंनी सराव करतो. तरीही, समाजाची मानसिकता बदलणं हा सर्वात मोठा अडथळा आहे.”
मुलींच्या पालकांना आवाहन करताना ती म्हणते, “तुमच्या मुलीत इच्छा आणि टॅलेंट असेल, तर तिला पाठिंबा द्या. तुमच्या विश्वासानं मुली खेळात सुद्धा खूप काही मिळवू शकतात.” इर्तिका आता भारतीय राष्ट्रीय रग्बी संघात स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेते. ती गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमनमधून कला शाखेत पदवी घेतेय आणि खेळाशी ताळमेळ साधते. ‘यश आणि अपयश हा खेळाचा भाग आहे. मी कधीच हार मानत नाही. माझ्या शब्दकोशात तो शब्दच नाही’ असं ती जिद्दीनं सांगते.
इर्तिका अय्यूब फक्त कोच नाही तर लाखो मुला-मुलींसाठी प्रेरणा आहे. संघर्षांनी परिभाषित काश्मीरमध्ये ती धैर्य, चिकाटी आणि स्वप्नांचं नवं चित्र रंगवतेय. रग्बीच्या मैदानावर ती मुलींना फक्त खेळ शिकवत नाही, तर आयुष्यात कसं उभं राहायचं, हेही शिकवतेय. इर्तिकाची कहाणी काश्मीरच्या नव्या पिढीला स्वप्नं पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter