राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमवेत रशियन सुरक्षा परिषदेचे उप-सचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी २४ जून २०२५ रोजी बिजिंग येथे झालेल्या शांघाई सहकार्य संघटना (एससीओ) सुरक्षा परिषद सचिवांच्या २०व्या बैठकीत दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका मांडली. त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढण्याची गरज अधोरेखित केली आणि भारताच्या कठोर पण संयमित कारवायांचे समर्थन केले. भारताने दहशतवादाविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दाखवलेल्या दृढनिश्चयाचे डोवाल यांनी यावेळी सविस्तर वर्णन केले.
भारताचे एससीओ सदस्य देशांशी शतकानुशतकांचे संबंध असल्याची आठवण यावेळी डोवाल यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या प्राचीन भारतीय तत्त्वाच्या आधारावर भारत सर्व सदस्य देशांसोबत समृद्धी आणि सहकार्य वाढवण्यास कटिबद्ध आहे. भारताच्या या ऐतिहासिक दृष्टिकोनावर भर देत सकारात्मक सहकार्याची हमी त्यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली.
दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम), अल कायदा आणि इसिस यांसारख्या गटांपासून भारताला सातत्याने धोका असल्याची चिंता एनएसए डोवाल यांनी व्यक्त केली. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. या हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा सहाय्यक गट ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) याने २६ भारतीय आणि नेपाळी नागरिकांचा धर्माच्या आधारावर छळ करून खून केला. यात अनेक जण जखमीही झाले.
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत दहशतवादी पायाभूत सुविधांचा नाश करून भारतात हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यात यश मिळाले. डोवाल यांनी स्पष्ट केले की भारताची ही कारवाई संयमित आणि तणाव वाढवणारी नव्हती. त्यांनी या ऑपरेशनचे यश अधोरेखित करत भारताच्या दहशतवादविरोधी दृढनिश्चयावर प्रकाश टाकला.
दहशतवादाविरुद्ध एकजुटीचे आवाहन
डोवाल यांनी दहशतवादाविरुद्ध दुटप्पी वृत्ती सोडण्याची गरज अधोरेखित केली. लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि त्यांच्या सहाय्यक गटांसारख्या दहशतवादी संघटनांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ठोस कारवाईची मागणी त्यांनी केली. त्यांनी ठामपणे सांगितले की, कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला, मग तो सीमापार असो वा अन्य, हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे.
दहशतवादी हल्ल्यांचे कर्ते, आयोजक, पुरवठादार आणि प्रायोजक यांना जबाबदार ठरवावे, त्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी एससीओ सदस्य देशांना केले.डोवाल यांनी यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज व्यक्त केली.
भारताच्या प्रस्तावांना पाठिंब्याची विनंती
डोवाल यांनी भारताने मांडलेल्या काही महत्त्वाच्या प्रस्तावांचा उल्लेख केला आणि त्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. यामध्ये खालील प्रस्तावांचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांविरुद्ध संयुक्त कारवाई: अल कायदा आणि त्याच्या सहाय्यक गटांसारख्या संघटनांविरुद्ध एकत्रित कृती योजना. कट्टरतावाद रोखण्यासाठी संयुक्त उपाय: दहशतवाद, फुटीरता आणि अतिरेकी विचारसरणीला कारणीभूत कट्टरतावादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना.
संयुक्त माहिती कारवाई: अतिरेकी विचारसरणीला प्रत्युत्तर देण्यासाठी माहितीच्या क्षेत्रात एकजुटीने काम करणे.
भारताची सकारात्मक भूमिका अधोरेखित करण्यात यश
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताच्या शांतता आणि सहकार्याच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी सांगितले की भारताचा ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा दृष्टिकोन एससीओ देशांसोबतच्या संबंधांना सकारात्मक दिशा देतो. भारत केवळ दहशतवादाविरुद्ध लढत नाही, तर आर्थिक सहकार्य, संपर्क वाढवणे आणि सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर यांनाही प्राधान्य देतो.
डोवाल यांनी बिजिंगमधील या परिषदेत भारताचे कूटनीतिक सामर्थ्य आणि दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका दाखवली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवादाविरुद्ध जागतिक स्तरावर एकजुटीची गरज प्रभावीपणे मांडली. यामुळे भारताची शांतताप्रिय पण दृढनिश्चयी प्रतिमा जगासमोर आली.