इराणच्या इस्लामिक क्रांतीचे नेते आयातुल्ला खामेनींचे बाराबंकीशी 'असे' होते जवळचे नाते

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
इमाम रुहुल्ला अल-मुसावी अल-खोमेनी
इमाम रुहुल्ला अल-मुसावी अल-खोमेनी

 

सध्या सोशल मीडियावर एक अविश्वसनीय कहाणी फिरत आहे. १९७९ मध्ये परराष्ट्रमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि परराष्ट्र सचिव जगत मेहता यांनी घेतलेल्या एका अनोख्या पुढाकारातून ही कथा आकाराला आली. तेव्हा इराणमध्ये शहा राजवट कोसळली आणि आयातुल्ला खोमेनी सत्तेवर आले होते. यामुळे नवी दिल्ली आणि तेहरान यांच्यातील संबंध अचानक धोक्यात आले होते.  

इस्लामिक क्रांतीचे पहिले सर्वोच्च नेते आयातुल्ला रुहुल्ला खोमेनी यांनी इराकमधील नजफ येथे आणि नंतर पॅरिसजवळील न्यूफ्ल-ले-शातो येथे अनेक वर्षे निर्वासित म्हणून काढली होती.
  
सर्वसामान्यांना माहीत नसलेली बाब म्हणजे भारतातील लखनौ आणि आजूबाजूचे कसबे १८व्या शतकाच्या मध्यापासून शिया शिक्षणाची केंद्रे होती. अवधचा पहिला नबाब सादत अली खान याने त्यांची सुरुवात केली. त्याने फैजाबाद आणि नंतर लखनौ येथे शिया राजवट स्थापन केली होती. सादत अली खान यांचे मूळ इराणमधील खोरासानमधील निशापूर येथे होते. इमाम रजा यांच्या मशहद येथील पवित्र स्थळाच्या दक्षिणेला हे गाव आहे.
  
अवधचा शेवटचा नबाब वाजिद अली शाह याने समुदायांमधील सांस्कृतिक आदानप्रदानाला चालना दिली. तो स्वतः राधेची भूमिका साकारत असे. त्याच वेळी कथक गुरू पंडित बिंदादीन, स्वर्गीय बिरजू महाराज यांचे पणजोबा, कृष्णाची भूमिका करत.  

अवधच्या नबाबांच्या काळात गंगा-जमुनी संस्कृती बहरली. गीत, नृत्य आणि नाटकांसोबतच लखनौ आणि आसपासच्या भागात, विशेषतः बाराबंकी जिल्ह्यातील किंटूर येथे शिया शिक्षणाची केंद्रे भरभराटीला आली.
  
इराणमध्ये आयातुल्ला सत्तेवर आल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला. लखनौ एकेकाळी शिया धर्मशास्त्राचा मरकज किंवा केंद्र होता. मग या केंद्राचा आणि इराणमधील नव्या सत्तेशी काही नाते आहे का? सद्दाम हुसेन यांच्या पतनापर्यंत अवधच्या नबाबांनी नजफ आणि करबाला येथील शिया पवित्र स्थळांच्या देखभालीसाठी सहा लाख रुपये दान दिले होते. सद्दाम हुसेन यांच्या काळात बगदादमधील भारताचे प्रभारी राजदूत राजेंद्र अभयंकर यांनी नजफ आणि करबाला येथील भारतीय विद्यार्थ्यांसाठी या निधीचा उपयोग केला.  

शहा राजवटीच्या पतनानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि जगत मेहता यांनी मला विचारले: “लखनौ आणि तेहरानमधील नव्या सत्ताधाऱ्यांमध्ये काही संबध आहे का?”
  
तपासातून समजले की असे दुवे होते. लखनौचे धर्मगुरू खोमेनी यांना नजफ आणि नंतर पॅरिसजवळ भेटले होते. खोमेनी यांचे किंटूर येथील विद्वान धर्मगुरूंच्या कुटुंबाशी नाते होते. यापैकी एक कमी ओळखले जाणारे धर्मगुरू आगा रुही अबाकती यांचा तर खोमेनींशी नातेसंबंध होता.  

जगत मेहता यांनी अबाकती यांना केंद्रस्थानी ठेवून एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाची योजना आखली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व समाजवादी नेते अशोक मेहता करणार होते. बदरुद्दीन तय्याबजी यांची निवड त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी झाली. अबाकती हे शिष्टमंडळाचे मार्गदर्शक होते. यावेळी तेहरानमधील भारतीय दूतावासाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले होते. आयातुल्ला खोमेनी यांच्या जमरान येथील कार्यालयात शिष्टमंडळाची भेट ठरली. पण भेट ठरल्यानंतर आणि शिष्टमंडळ पोहोचेपर्यंत काहीतरी अनपेक्षित घडले. 

राजदूत अहुजा तेहरानमध्ये नव्हते. त्यामुळे कुलदीप सहदेव यांना या ऐतिहासिक शिष्टमंडळासोबत खोमेनी यांच्या कार्यालयात जावे लागले.यावेळी शिष्टमंडळाला एक अनोखा अनुभव आला. तेहरानमध्ये जे काही नव्याने उदयास आले होते त्याची तुलना फक्त व्हॅटिकनशी होऊ शकत होती जिथे पोप सर्वोच्च आहे.
  
भारतीय शिष्टमंडळ सभागृहात पोहोचले. आयातुल्ला खोमेनी थोड्याच अंतरावर बसले होते. त्यांनी हलक्या इशाऱ्याने शिष्टमंडळाला प्रवेशद्वाराजवळ थांबायला सांगितले. नंतर त्यांनी काळी पागोटी आणि काळा झगा घातलेल्या सहाय्यकाला अबाकती यांना जवळ बोलवायला सांगितले. बाकती यांना वाटले की इस्लामिक क्रांतीचे संस्थापक त्यांना आपले नातेवाईक म्हणून मिठी मारतील. पण तसे झाले नाही. खोमेनी यांनी अबाकती यांना कठोर शब्द सुनावले. सर्वोच्च नेते आपल्या तिखट टीकेत मग्न होते. शिष्टमंडळ अवाक् झाले. ते शांतपणे मागे फिरले आणि वाट पाहत असलेल्या गाड्यांकडे गेले. तेहरानमधील सर्व बैठका रद्द झाल्या. शिष्टमंडळाने पहिल्या विमानाने दिल्ली गाठली. हा अनुभव त्यांच्यासाठी धक्कादायक होता.  

नंतरच्या एका भेटीत, कोम येथील एका आयातुल्लाने मला अबाकती यांच्या पुढाकाराचे अपयशाचे कारण सांगितले. ते म्हणाले, “ही क्रांती नाजूक आहे. आमचे शत्रू अनपेक्षित ठिकाणी दबा धरून आहेत.” इस्लामिक क्रांतीच्या नेत्याचे 'परदेशी मूळ' शत्रूंसाठी घातक हत्यार ठरू शकते. अबाकती भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्वच यामुळे करत होते कारण ते किंटूर येथील प्रतिष्ठित धर्मगुरूंच्या कुटुंबातून आले होते आणि खोमेनी यांच्याशी त्यांचे नाते होते. हे खरे असले तरी सध्या त्याचा प्रसार इस्लामी क्रांतीच्या रक्षकांच्या सोयीचा नव्हता.
  
हा क्रांतीच्या आरंभाचा काळ होता. याच संदर्भात, इराणचे लोकप्रिय राजदूत गोलामरेझा अन्सारी यांनी एका स्वागत समारंभात आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली होती. यावेळी त्यांनी भारत आणि इराण यांच्यातील सांस्कृतिक नात्यावर भर दिला होता.ते म्हणाले, “इस्लामिक क्रांतीचे नेते आयातुल्ला खोमेनी यांचे मूळ भारतात आहे.” त्यांनी हे लीला हॉटेलमधील भरगच्च सभागृहात सांगितले होते. कारण अन्सारी यांना खात्री पटली होती की क्रांतीच्या सुरुवातीच्या अनिश्चिततेचा काळ आता मागे पडला आहे. तेहरानमधील सत्ता आता स्थिर आहे.  

दोन्ही देशांमधील सांस्कृतिक दुवे मला नेहमी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शिराजमधील हाफिझच्या समाधीच्या भेटीची आठवण करून देतात. समाधीजवळ एक छोटे ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयाच्या कर्णिकेवर एक उल्लेखनीय छायाचित्र आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इराण दौऱ्यात शिराजमधील हाफिझच्या समाधीला विशेष भेट दिली होती.त्याचे ते छायाचित्र आहे.  

या छायाचित्रात टागोर 'फाल'चा विधी करताना दिसतात. या विधीत पवित्र पुस्तक किंवा कवीच्या कवितांचे पुस्तक उघडले जाते. कोणतेही पान उघडल्यावर पहिली ओळ तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे आहे, त्याचा सुगावा देते असे मानले जाते. ही श्रद्धेची बाब नसून, एक काव्यात्मक आनंद आहे. संवादासाठी एक सुरुवात म्हणून श्लोक उद्धृत करण्याचे निमित्तमात्र.

- सईद नकवी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आहेत.)