नवी दिल्ली
नीट परीक्षेतील अनियमितता आणि पेपर लीक प्रकरणाविरोधात देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिनेही पाठिंबा दर्शवला आहे. मुलांना अशा व्यवस्थेची गरज आहे जिथे त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, असे करिनाने म्हटले आहे.
करिना कपूर हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली भूमिका मांडली आहे. ती म्हणाली, "विद्यार्थ्यांचे ऐकले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांना शिक्षणाचे महत्त्व माहीत असते. जर त्यांना असे वाटू लागले की प्रामाणिकपणा आणि कष्टाला काहीही किंमत उरलेली नाही, तर त्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडेल. प्रत्येक मुलाची सुरुवात समान पातळीवर झाली पाहिजे, ही कोणतीही मोठी मागणी नाही तर मूलभूत गरज आहे."
करिनासोबतच अभिनेत्री अनन्या पांढरे, सारा अली खान, ट्विंकल खन्ना आणि अभिनेता वरुण धवन यांनीही विद्यार्थी आंदोलनाचे समर्थन केले आहे. अनन्या पांढरे हिने Gen Z पिढीच्या धाडसाचे कौतुक करताना म्हटले की, प्रश्न विचारणे म्हणजे अनादर नव्हे तर ती एक आशा आहे. ट्विंकल खन्नाने मुंबईतील आंदोलनाचे फोटो शेअर करत तरुणांच्या धैर्याचे कौतुक केले. सारा अली खानने विद्यार्थ्यांची जिद्द प्रेरणादायी असल्याचे सांगत सरकार न्याय देईल असा विश्वास व्यक्त केला.
वरुण धवनने अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे आवाहन करत, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला असला पाहिजे, असे मत व्यक्त केले.