'द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली': बॉलिवूडच्या 'सुरमा-टोपी'वाल्या मुस्लिम साच्याला छेद देणारी कथा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
'द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली' चित्रपटातील प्रसंग
'द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली' चित्रपटातील प्रसंग

 

'पीपली लाइव्ह' फेम दिग्दर्शिका अनूषा रिझवी यांचा 'द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली' हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कॉमेडीच्या माध्यमातून एक गंभीर मुद्दा मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. यात कोणतेही मोठे राजकीय भाष्य नाही किंवा कोणताही भडकपणा नाही. तरीही हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्षे मुस्लिम पात्रांना एका विशिष्ट साच्यात अडकवून ठेवले आहे. डोळ्यांत सुरमा, डोक्यावर टोपी, सतत 'जनाब' म्हणण्याची सवय आणि पार्श्वभूमीला कव्वाली असे चित्रच प्रेक्षकांच्या मनावर बिंबवले गेले आहे. शम्सुद्दीन कुटुंबाची गोष्ट या साच्याला पूर्णपणे छेद देते. ही माणसे तुमच्या-आमच्यासारखीच सामान्य दाखवली गेली आहेत. ती जीन्स घालतात, आधुनिक तंत्रज्ञान वापरतात आणि त्यांचे प्रश्नही दैनंदिन जगण्याशी निगडित आहेत. मुस्लिम समाजाचे हे सामान्य चित्रणच आजच्या काळात सर्वात मोठी राजकीय भूमिका ठरते.

चित्रपटातील वातावरण हलकेफुलके असले तरी त्यात एक सुप्त अस्वस्थता जाणवते. एका दृश्यात पोलीस चौकशीसाठी येतात, तेव्हा कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर उमटणारी भीती बोलकी आहे. कोणाचेही नाव न घेता किंवा थेट विधान न करता दिग्दर्शिकेने सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे चित्रण केले आहे. सीएए-एनआरसी (CAA-NRC) सारख्या विषयांची अस्पष्ट चर्चा आणि त्यातून निर्माण झालेली अनिश्चितता संवादांच्या ओघात येते.

फरिदा जलाल, शीबा चढ्ढा यांसारख्या कसलेल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला जिवंत केले आहे. घरातील आजींचे हजला जाण्याचे स्वप्न, तरुणांचे करियर आणि प्रेमाचे प्रश्न यावर चित्रपट भाष्य करतो. पण हे सर्व पाहताना प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न सतत रेंगाळतो तो म्हणजे, एका विशिष्ट समुदायाला सामान्य माणसांसारखे पडद्यावर पाहणे आपल्याला इतके वेगळे का वाटते? मुख्य प्रवाहातील माध्यमांनी निर्माण केलेल्या प्रतिमेमुळे हे अंतर निर्माण झाले आहे का?

थोडक्यात सांगायचे तर, 'द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली' या चित्रपटाने वर्तमानातील सामाजिक अस्थिरतेवर हळुवार फुंकर घालण्याचे काम केले आहे. धर्माच्या भिंती ओलांडून माणसाला माणूस म्हणून पाहण्यासाठी हा चित्रपट प्रवृत्त करत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीने वर्षानुवर्षे उभे केलेले ठोकताळे मोडण्यातच या चित्रपटाचेचे खरे यश आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून ती कथा विचार करायला लावणारी आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter