उर्दू कवितांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. उर्दू कवितांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांना स्पर्श केला आहे. इतिहासापासून वर्तमानापर्यंत, प्रेमापासून आंदोलनापर्यंत उर्दू कविता प्रत्येक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आली आहे. उर्दू कवितेने स्वातंत्र्य आंदोलनाची प्रवक्ता म्हणूनही काम केले. ती प्रेमिकांच्या संवेदनांची, जाणिवांची वाहक बनली. उर्दू कवितेने स्वातंत्र्याचा विचार जिवंत ठेवला. उर्दूने जसे उलटून गेलेल्या काळातील जाणिवा जपल्या तसे नववर्षाचे स्वागतही केले. नव्या वर्षाच्या स्वागताच्या कविताही लिहिल्या आहेत. उर्दूत नववर्षाच्या स्वागतात लिहिलेल्या कवितांची संख्या शेकडोच्या घरात आहे. उर्दूत नववर्षाच्या स्वागतात लिहिलेल्या कवितांची सुरुवात ही वसाहतकाळात होते. भारतात इंग्रज येण्यापुर्वी फसली आणि काही प्रमाणात हिजरी कालगणना प्रमाण मानली जात होती. त्यामुळे ख्रिस्त कालगणना व त्याविषयीच्या कवितांची सुरुवात ही उर्दू भाषेत खूप उशीरा झाली आहे.
इब्ने इन्शा यांनी केली सुरुवात
इब्ने इन्शा (१९२७-७८) हे उर्दू साहित्यातील प्रयोगशील साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक साहित्यप्रकार हाताळले आहेत. शेर मोहम्मद खान हे त्यांचे मूळ नाव. मुळचे जालंधरचे असलेले शेर मोहम्मद हे इब्ने इन्शा म्हणून उर्दू साहित्यात ओळखले जातात. ‘उर्दू की आखरी किताब’ हे त्यांचे उपहासात्मक पुस्तक उर्दूत खूपच गाजले. ‘इस बस्ती के कुचे में’ या काव्यसंग्रहात त्यांनी नव्य वर्षाच्या स्वागताचे शेर लिहिले आहेत. त्यात ते म्हणतात,
‘‘यूं कहने को राहें मुल्क ए वफा की उजाल गया
इक धुंद मिली जिस राह में पैक ए खयाल गया’’
ही नववर्षाच्या स्वागतावर लिहिलेल्या कवितेची सुरुवात आहे. यानंतर या कवितेत ते लिहितात,
‘‘एक साल गया एक साल नया है आने को
पर वक्त की भी है अब होश नहीं दिवाने को
दिल हाथ से उसके वहशी हिरन की मिसाल गया
हम अहले वफा रंजूर सही, मजबूर नहीं ।’’
इब्ने इन्शा यांची ही कविता आता नवर्षाच्या स्वागतासाठी सर्रास वापरली जाते.
फैज लुधियानवी यांची कविता सर्वाधीक लोकप्रिय
नववर्षाच्या स्वागतावर उर्दूत लिहिलेल्या कवितांपैकी फैज लुधियानवी (१९११ - १९९५) यांची कविता सर्वाधिक लोकप्रिय आहे. देशप्रेम आणि स्वातंत्र्य आंदोलनासाठी तरुणांना प्रेरित करणे हा त्यांच्या कवितेचा उद्देश होता. फैज यांच्या कवितेत विद्रोह, परिवर्तन या भूमिका केंद्रस्थानी आहेत. त्यांनी ‘किमती बातें’, ‘बच्चों की बहार’, दस नजमें ही त्यांनी लिहिलेली काही महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यांनी उर्दू कवितांमध्ये नवे बदल करुन पाहिले. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांच्या कविता विशेष लोकप्रिय ठरल्या होत्या. फैज लुधियानवी यांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ‘ऐ नए साल बता तुझमे नया क्या है?’ ही कविता लिहिली होती. त्यात ते लिहितात,
‘‘ऐ नए साल बता तुझमें नयापन क्या है?
हर तरफ खल्कने क्यूं शोर मचा रखा है?
रौशनी दिन की वही, तारोंभरी रात वही
आज हमको नजर आती है हर बात वही
आसमान बदला है, अफसोस ना बदली है जमीं
एक हिंदसे का बदलना कोई जिद्दत तो नहीं
अगले बरसों की तरह होंगे करीने तेरे
किसे मालूम नहीं बारा महिने तेरे’’
ऐतेबार साजीद नववर्षाच्या स्वागताची कविता
ऐतबार साजीद यांचा जन्म १९४८ मध्ये मुलतान येथे झाला. सुरुवातीला प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. शायरी शिवाय त्यांनी मोठ्याप्रमाणात गद्यलेखन केले. ‘पटाखे’, ‘कारस्तानियां’, ‘भूंचाल’ या त्यांच्या कांदबऱ्या गाजल्या आहे. त्याशिवाय ‘भारत में चंद रोज’ हे प्रवासवर्णन, ‘रेत में गुलाब’ हा कथासंग्रह विख्यात आहे. ऐतबार साजीद यांच्या कविता प्रेम आणि विरहावर आधारीत आहेत. त्यांनी नववर्षासंदर्भात काही शेर लिहिले आहेत. त्यातही दुःख केंद्रस्थानी आहे. ते लिहितात,
‘‘किसी को साल ए नौ की क्या मुबारकबाद दी जाए
कॅलेंडर के बदलने से मुकद्दर कब बदलता है?’’
अहमद फराज
अहमद फराज (१९३१-२००८) हे खैबर पख्तूनमध्ये १९३१ मध्ये जन्मले. त्यांचे मुळ नाव सय्यद अहमद शाह हे होते. पश्तू ही त्यांची मातृभाषा होती. त्यांनी सत्तेच्या विरोधात सातत्याने बंडाची भूमिका घेतली. त्यांच्या कविता या विद्रोही प्रेरणांसाठी विख्यात आहेत. त्यांनी ‘तनहा तनहा’, ‘नाबिना शहर में आईना’, ‘बेआवाज गली कुचों में’, ‘यह सब मेरी आवाजें हैं’ हे त्यांचे महत्वाचे कवितासंग्रह आहेत. त्यांनी उर्दू भाषेत लिहिलेल्या कविता जगभरात लोकप्रिय ठरल्या आहेत. ‘न शब व रोज बदले हैं’ ही त्यांची नववर्षावरील कविता आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रचलित धारणा नाकारल्या आहेत. ते लिहितात,
‘न शब व रोज बदले हैं, ना हाल अच्छा है।
किसी ब्रह्मन ने कहा था, कि यह साल अच्छा है।
हम के दोनों के गिरफ्तार रहे जानते हैं,
दामें दुनिया से कहीं जुल्फ का जाल अच्छा है।’
साहिर लुधियानवी
साहिर लुधियानवी (१९२१-१९८०) हे उर्दूसोबतच इंग्रजी, हिंदी, मराठी साहित्य जगतातील रसिकांना भूरळ घालणारे नाव आहे. त्यांनी महाविद्यालयीन आयुष्यातच शायरीला सुरुवात केली. त्यांचा जन्म लुधियानामध्ये झाला. त्यांचे मूळ नाव अब्दुल हई होते. वसाहतकाळात लुधियाना हे उर्दू साहित्याचे केंद्र मानले जात होते. तेथूनच त्यांच्या शायरीविषयीचे प्रेम निर्माण झाले. त्यांनी लुधियानाच्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या राजकीय विचारांना चालना मिळाली. त्यामुळे ते मार्क्सवादी चळवळीत ओढले गेले. अमृता प्रितम यांच्यासोबतच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र व्हायला लागली. त्यानंतर त्यांना महाविद्यालयातून निलंबीत करण्यात आले. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर ते भारतात परतले. त्यांनी भारतात अनेक सिनेमांची गाणी लिहिली. साहिर यांनी ‘सुबह ए नवरोज’ या नावाने नववर्षावर कविता लिहिली आहे. त्यात म्हणतात,
‘फुट पडी मशरीक से किरनें
हाल बना माजी का फसाना
गुंजा मुस्तकबील का तराना
भेजे हैं अहबाब ने तोहफें
अटे पडें मेज के कोने
दुल्हन बनी हुईं हैं राहें
जश्न मानाओ साल ए नौ के’
अली सरदार जाफरी
फैज लुधियानवी, ऐतबार साजिद, अहमद फराज वगैरेंप्रमाणेच अली सरदार जाफरी हे उर्दूतील मोठं नाव. त्यांनीही नववर्षाचे आपल्या शैलीत स्वागत केले आहे. अली सरदार जाफरी यांनी एका कवितेत नववर्षासंदर्भात लिहिले आहे,
‘एक अजनबी के हात में देकर हमारा हाथ
लो साथ छोडने लगा आखिर ये साल भी’
कतिल शिफाई
उर्दूतील आणखी एक प्रसिद्ध शायर कतिल शिफाई त्यांच्या ‘रक्स करने को मिला हुकूम जो दरीयांओं में’ या कवितेत नव्या वर्षाविषयी तक्रार करतात. ही कविता निश्चित केलेल्या ध्रुवपदावर एका मुशायऱ्या सादर केलेली आहे. ज्यात ते म्हणतात,
‘जिस ब्रह्मन ने कहा के ये साल अच्छा है
उसको दफनाओ मेरे हाथ की रेखाओं में’
उर्दूतील या काही निवडक आणि प्रतिनिधिक कविता आहेत. ज्यामध्ये नववर्षाविषयी तक्रारीचा सुर आहे. नववर्षाविषयी तक्रार करताना विवेकवादाच्या माध्यमातून भविष्यकथनाला दिलेले आव्हान आहे. तर काही कविता या नुसत्याच नववर्षाचे स्वागत करणाऱ्या आहेत.
सरफराज अहमद
(लेखक मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत.)