दिल्ली गोठली! किमान तापमान ३.२ अंशांवर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दिल्लीकर सध्या कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. शनिवारी सकाळी राजधानीतील किमान तापमान ३.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. सफदरजंग वेधशाळेने या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली आहे. थंडीच्या तीव्र लाटेमुळे संपूर्ण शहर अक्षरशः गारठून गेले आहे.

रात्री आणि पहाटेच्या वेळी शहरावर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. पालम वेधशाळेजवळ दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) ५० मीटरपर्यंत खाली आली होती. सफदरजंग परिसरातही दृश्यमानता २०० मीटर इतकी नोंदवण्यात आली. या दाट धुक्याचा मोठा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. दृश्यमानता कमी असल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. तसेच रेल्वे आणि विमान वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे.

उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे देशाच्या विविध भागांतून दिल्लीकडे येणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. प्रवाशांना स्थानकांवर तासन् तास ताटकळत राहावे लागत आहे. दिल्ली विमानतळावरही धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला असून प्रवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिल्ली आणि आसपासच्या परिसरासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. येत्या दोन दिवसांत थंडीची लाट आणि दाट धुके असेच कायम राहण्याची शक्यता आहे. लोधी रोड परिसरातही तापमानाचा पारा ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. विशेष म्हणजे, दिल्लीतील या थंडीने डेहराडून, नैनिताल आणि धरमशाला यांसारख्या प्रसिद्ध डोंगरी पर्यटन स्थळांनाही मागे टाकले आहे. तिथे दिल्लीपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे.

थंडीसोबतच हवेच्या गुणवत्तेनेही दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील हवेचा दर्जा 'अत्यंत खराब' श्रेणीत आहे. वाढते प्रदूषण आणि कडाक्याची थंडी या दुहेरी संकटामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बेघर लोकांना थंडीपासून वाचवण्यासाठी प्रशासनाने निवारा केंद्रांची (रैनबसेरा) व्यवस्था केली आहे. अनेक ठिकाणी लोक थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.