दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि नात्यांचा उत्सव. याच सणातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. बहीण-भावाच्या पवित्र नात्याला समर्पित हा दिवस. समाजातील काही माणसे या नात्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजालाच आपले कुटुंब मानतात. याचेच एक प्रेरणादायी उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पाहायला मिळाले.
अल मदिना वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि JMBR ग्रुपचे सर्वेसर्वा दुबईतील प्रसिद्ध उद्योजक बशीर हजवानी यांनी एक अनोखी भाऊबीज साजरी करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आदर्श उदाहरण समाजाला दिले आहे. बशीर हजवानी हे मूळचे खेड तालुक्यातील उधळे गावचे सुपुत्र. बशीर एम हजवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून ते वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवतात. सामाजिक द्वेष पसरणाऱ्या या वातावरणात बशीर कार्य समाजाला दिशा देणारे आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारी भाऊबीज
सोमवारी २० ऑक्टोबरला उधळे गावात या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बशीर हजवानी यांनी पंचक्रोशीतील सुमारे सोळाशे महिलांचे भाऊ बनून त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. हा कार्यक्रम म्हणजे जणू दोन धर्मांना जोडणारा एक भावनिक सोहळा होता. परिसरातील महिला, नागरिक आणि अनेक मान्यवर या अनोख्या भाऊबीजेचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बशीर हजवानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे शब्द प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे होते. ते म्हणाले, “आपले धर्म वेगवेगळे असतील, परंतु आपण केवळ माणुसकी मानायला हवी. दिवाळी असो किंवा ईद, आनंदाचा प्रत्येक क्षण आपण सर्वांनी मिळून साजरा केला पाहिजे. हेच खऱ्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. भाऊबीज साजरी करून मी काही मोठं काम केलं नाही. यादिवशी मला इथे येऊन शुभेच्छा देता आल्या, याहून आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही.”
ते पुढे म्हणतात, “माणूस पैशाने किंवा सत्तेने कधीच मोठा होत नाही. तर तो घरातील सुख-शांतीने श्रीमंत होतो. आणि ही सुख-शांती मला समाजाकार्याने मिळते. समाजात वावरताना आपण इतरांशी कसे वागतो यावर ते मूल्यमापन होत असते. त्यामुळे मी माणुसकी हाच खरा धर्म आणि मानवसेवा हेच कर्म मानतो.”
तरुणांना प्रेरणा देताना बशीर हजवानी म्हणतात, “मी कितीही मोठा उद्योपती झालो तरीही मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो की हे सर्व काही कष्टाने कमवलेले आहे. त्यामुळे आपण आपली जमिनीतील मुळे सोडायची नाहीत, जमिनीला संलग्न राहायचं. तरच आपण आनंदी आणि समाधानी राहू शकतो. मी तरुणानांना सांगू इच्छितो की सोशल मीडियावर आपली शक्ती वाया घालवताय ती सत्कर्म करण्यासाठी लावा. आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे याचा विचार करा आणि तशी वाटचाल सुरु ठेवा.”
बशीर यांनी राबवलेल्या या उपक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान दिसत होते. या उपक्रमामुळे परिसरात ऐक्य, सौहार्द आणि बंधुत्वाची भावना अधिक घट्ट झाली झाल्याचे चित्र दिसत होते. दिवाळीच्या प्रकाशात त्यांनी लावलेली ही सामाजिक सलोख्याची पणती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
बशीर एम हजवानी फाऊंडेशनचे कार्य
बशीर हजवानी गेल्या अनेक वर्षांपासून उधळे परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यांचे कार्य केवळ एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून हा सेवाभाव मानवतेसाठी आहे. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या एम.आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता करिअर काउंसिलिंग सत्रांचे आयोजन केले जाते. बशीर यांनी कोकण परिसरात अनेक अॅम्ब्युलन्सेस व रेस्क्यू व्हॅन्स दान केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आपत्ती निवारणातही त्यांनी मोठी भूमिका बाजवली आहे. फाऊंडेशनमार्फत आपत्ती काळात मोठे मदतकार्य केले जाते. परिसरातील पूरग्रस्तांसाठी त्यांनी घरे देखील बांधून दिली आहेत. तसेच सुरक्षेची खबरदारी घेत फाऊंडेशनच्या माध्यमातून खेड शहरात जागोजागी CCTV सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. परिसरातील पोलीस स्टेशनला संगणक देण्यात आलेत.
बशीर यांचे कार्य इथेच संपत नाही. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांसाठी ते मोफत सामूहिक विवाह सोहळेदेखील राबवतात. अशा उपक्रमांचे आयोजन करून ते समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळेच जनतेने त्यांना बहाल केलेल्या ‘कोहिनुर-ए-कोकण’ हा खिताब किती सार्थ आहे याचीच प्रचिती येते.