लातूरच्या गणी सय्यदने दाखवली अनोखी विठ्ठलभक्ती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 h ago
 विठ्ठलाला चांदीचा मुकुट अर्पण करताना मुस्लिम तरुण गणी सय्यद सोबत गहिनीनाथ महाराज औसेकर.
विठ्ठलाला चांदीचा मुकुट अर्पण करताना मुस्लिम तरुण गणी सय्यद सोबत गहिनीनाथ महाराज औसेकर.

 

लातूरच्या गणी सय्यद यांनी आपल्या अनोख्या विठ्ठलभक्तीने सर्वांचे मन जिंकले आहे. दगड फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणी यांनी काल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक लाख रुपये किमतीचा एक किलो चांदीचा मुकुट अर्पण केला. या भक्तीने त्यांनी सामाजिक आणि धार्मिक समतेचा संदेश दिला. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी गणी यांचा सत्कार करून त्याच्या भक्तीचे स्वागत केले. ही कृती हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि वारकरी संप्रदायाच्या समतेच्या तत्त्वाचे प्रतीक बनली आहे.

गणी सय्यद हे लातूरचे रहिवासी असून ते दगड फोडण्याचे काम करतात. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी लागणारा दगड पुरवण्याचे काम गणी करत आहेत. या कामाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात त्यांचे येणे-जाणे वाढले. याच दरम्यान, त्याला विठ्ठलाच्या भक्तीने स्पर्श केला. गणी सय्यद यांनी आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातून एक किलो चांदीचा मुकुट बनवला आणि तो पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला. ही घटना पंढरपूर वारीदरम्यान घडली असल्यामुळे या अधिक महत्व प्राप्त झालं आहे. गणी आपल्या भक्ती आणि समर्पणाविषयी सांगतात, "मी मशिदीत नमाज पठण करतो, पण विठ्ठल माझ्यासाठीही हिंदू बांधवांतितकाच प्रिय आहे. देव, देश आणि धर्म एकच आहे.”

गणी सय्यदची यांची भक्ती संत तुकाराम आणि संत अनगडशाह बाबा यांच्यातील प्रेमळ नात्याची आठवण करून देते. संत तुकाराम आणि अनगडशाह बाबा यांच्यातील मैत्री हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. अनगडशाह बाबा हे विठ्ठलभक्त मुस्लिम संत होते. त्यांनी तुकाराम महाराजांसोबत भक्तीचा मार्ग स्वीकारला होता. ही परंपरा आजही पंढरपूरच्या वारीत जपली जाते. गणी सय्यद यांनीही याच परंपरेचा वारसा पुढे नेला असं म्हटल तरी वावगं ठरणार नाही. आजच्या काळात काही समाजकंटकांकडून समाजात द्वेष पसरवला जात असताना गणी सय्यद यांच्या कृतीने समाजातील एकोप्याला नवसंजीवनी दिली आहे.

गणी सय्यद यांच्या या कृतीला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी गणी यांच्या कृतीचे कौतुक करत त्यांना सामाजिक समतेचा संदेश देणारा भक्त म्हटल आहे. वारकरी संप्रदाय आणि श्री विठ्ठल हे समतेचा प्रतीक मानले जाते. वारकरी संप्रदायात हिंदू, मुस्लिम आणि अन्य धर्माचे भक्त सहभागी होतात. या संप्रदायातील लोक विठ्ठलाचे भक्त आहेत. लातूर येथील मुस्लिम समाजातील गणी सय्यद हा देखील एक विठ्ठलभक्त आहे.   


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter