जगन्नाथपुरी रथयात्रेत दरम्यान घडली मोठी दुर्घटना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 18 h ago
जगन्नाथ पुरी रथयात्रा
जगन्नाथ पुरी रथयात्रा

 

ओडिशा येथे दरवर्षी साजरी होणारी भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा ही जगप्रसिद्ध धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. काल रथयात्रेदरम्यान तालध्वज रथाला गर्दीमुळे मोठी दुर्घटना घडली. हजारो भाविकांनी भगवान बलभद्र यांच्या रथाला ओढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात ६०० हून अधिक भाविक जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.  

काय घडलं?
रथयात्रेच्या पहिल्या दिवशीच म्हणजे काल दुपारी बलभद्र यांचा तालध्वज रथ प्रथम निघाला. त्यानंतर सुभद्रा यांचा दरपदलन आणि जगन्नाथ यांचा नंदीघोष रथ निघाले. परंतु, तालध्वज रथ बलगांडी चौकात अडकला. रथाला ओढण्यासाठी उत्साही भाविकांनी रथाच्या दोरखंडांना धरून जोर लावला. याच वेळी प्रचंड गर्दीमुळे अनेकजण एकमेकांवर पडले. उष्णता आणि दमट हवामानामुळेही काही भाविक बेशुद्ध झाले. यात ६०० हून अधिक जणांना दुखापत झाली, तर नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने पुरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रशासनाची तयारी आणि आव्हाने
या यात्रेसाठी प्रशासनाने १०,००० सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते. यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (CAPF) आठ कंपन्या आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यांचा समावेश होता. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येत होती. तरीही, अपेक्षेपेक्षा दीडपट जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. बलगांडी चौकात रथ थांबल्याने गर्दी आणखी वाढली, आणि यातूनच ही दुर्घटना घडली. 

सरकारची प्रतिक्रिया
ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मुकेश महालिंग यांनी सांगितले की, उष्णता आणि दमट हवामानामुळे काही भाविक बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णवाहिका उपलब्ध होत्या. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवले आणि जखमींना योग्य उपचार मिळतील याची खात्री केली. 

रथयात्रेची परंपरा आणि महत्त्व
पुरी येथील रथयात्रा ही भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्तींची मिरवणूक आहे. ही मिरवणूक १२व्या शतकातील श्रीजगन्नाथ मंदिरापासून सुमारे २.५ किमी दूर असलेल्या गुंडिचा मंदिरापर्यंत जाते. भाविक या रथांना ओढण्यासाठी उत्साहाने सहभागी होतात. ही यात्रा नऊ दिवस चालते, आणि यात लाखो भाविक देश-विदेशातून येतात. यंदा जवळपास दहा लाख भाविकांनी पुरीत हजेरी लावली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter