महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर लोटला भीमसागर; इंदू मिलमधील भव्य स्मारकाचे कामही अंतिम टप्प्यात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत अनुयायांचा महासागर लोटला आहे. दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसर 'जय भीम'च्या नाद्घोषाने दुमदुमून गेला आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि पंजाब या राज्यांमधूनही हजारो अनुयायी आपल्या लाडक्या नेत्याला वंदन करण्यासाठी दादरमध्ये दाखल झाले आहेत.

या भावपूर्ण वातावरणात एकीकडे अनुयायांची अलोट गर्दी आणि दुसरीकडे इंदू मिलमध्ये आकार घेत असलेल्या बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाचे काम, असे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे.

चैत्यभूमीवर सुविधांची रेलचेल

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात नागरी सेवा-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्कवर अनुयायांच्या तात्पुरत्या निवासासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून, तिथे कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी एलईडी स्क्रीनची (LED Screens) व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. अभिवादन रांगेत आणि मुख्य मार्गावर मिळून एकूण १५० फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत, तर मैदान परिसरात २५४ शौचालयांची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या सोयीसाठी खास 'पिंक टॉयलेट्स' तैनात करण्यात आले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर 'दीपस्तंभ' या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी अनुयायांसाठी अन्नाची पाकिटे आणि पाण्याची सोय केली आहे, तर काही ठिकाणी जनजागृतीपर पथनाट्ये सादर केली जात आहेत.

पुस्तकांचे स्टॉल आणि अनुयायांच्या भावना

महापरिनिर्वाण दिनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकांची खरेदी. ६ डिसेंबर १९६९ ला पहिल्यांदा येथे पुस्तक स्टॉल सुरू झाले होते, ती परंपरा आजही कायम आहे. 'भारतीय संविधान' आणि 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकांना अनुयायांकडून सर्वाधिक मागणी असते.

येथे आलेल्या अनुयायांच्या भावना अत्यंत बोलक्या आहेत. पीएचडी करणारी विद्यार्थिनी शर्वरी पवार म्हणाली, "वाचन हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन आहे." अकोल्याचे साहेबराव इंगळे यांनी सांगितले की, ते ४१ वर्षांपासून गायन आणि भजनाच्या माध्यमातून बाबासाहेबांना वंदन करत आहेत. तर बुलडाण्याचे शाहीर विलास वारे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, "आज आम्ही जे काही आहोत, ते केवळ बाबासाहेबांमुळेच आहोत. त्यांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत." दरम्यान, माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून 'चैत्यभूमी' करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे.

भव्य स्मारक प्रगतीपथावर: काय आहे सद्यस्थिती?

अनुयायांचे लक्ष लागून राहिलेल्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) १२ एकर जागेवर हे स्मारक उभारले जात असून, त्यासाठी १,०८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या स्मारकाचे काम आता निर्णायक टप्प्यावर आले आहे. स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह आणि वाहनतळाची १०० टक्के रचनात्मक (Structural) कामे पूर्ण झाली आहेत. आता अंतर्गत सजावटीचे काम आणि बाह्य विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत.

स्मारकाची वैशिष्ट्ये:

  • ४५० फुटी पुतळा: स्मारकाचे मुख्य आकर्षण असलेला बाबासाहेबांचा पुतळा एकूण ४५० फूट उंच असेल. यात १०० फूट उंचीची इमारत (चौथरा) आणि त्यावर ३५० फूट उंचीचा बाबासाहेबांचा ब्राँझ धातूचे आवरण असलेला पुतळा असेल.

  • कामाची प्रगती: पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. पुतळ्यासाठी आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू आहे. या भव्य पुतळ्यासाठी तब्बल ६ हजार टन पोलाद लागणार असून, त्यापैकी १,४०० टन पोलाद आले आहे आणि ६५० टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे.

  • इतर सुविधा: स्मारकात भव्य चैत्य हॉल, लायब्ररी, म्युझियम आणि विश्रांतीगृह असेल. तसेच, ४७० वाहनांसाठी दुमजली बेसमेंट पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

हे स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण होऊन जनतेसाठी खुले होईल, असा विश्वास एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेबांचा समतेचा संदेश, त्यांचे अनमोल कार्य आणि संविधानाचे महत्त्व जगभरात पोहोचवणे, हा या स्मारकाचा मुख्य उद्देश आहे.