"पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा!"; माजी पेंटागॉन अधिकाऱ्याची अमेरिकेकडे मागणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 Months ago
पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन
पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन

 

अमेरिकेने पाकिस्तानला 'दहशतवादाचा प्रायोजक देश'  म्हणून घोषित केले पाहिजे, अशी जोरदार मागणी पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला जवळ करण्यात कोणताही धोरणात्मक तर्क नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.

रुबिन यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या जूनमध्ये होऊ घातलेल्या संभाव्य व्हाईट हाऊस भेटीवरही तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, "जर असीम मुनीर अमेरिकेत आले, तर त्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना अटक करण्यात यावी."

"अमेरिकेने पाकिस्तानला मिठी मारण्यात कोणताही शहाणपणा नाही. तो अमेरिकेचा 'प्रमुख बिगर-नाटो मित्र देश' (Major non-NATO ally) असता कामा नये. त्याला दहशतवादाचा प्रायोजक देश घोषित केले पाहिजे, बस एवढेच," असे रुबिन यांनी ठामपणे सांगितले.

भारताची माफी मागावी

मायकल रुबिन यांनी केवळ पाकिस्तानवरच नव्हे, तर अमेरिकेच्या भारताविरोधातील धोरणांवरही टीका केली. रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या कारणावरून अमेरिकेने ऑगस्टमध्ये भारतीय आयातीवर ५० टक्के अतिरिक्त टॅरिफ (आयात शुल्क) लादले होते. याबद्दल अमेरिकेने भारताची जाहीर माफी मागितली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, जरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना माफी मागायला आवडत नसले, तरी अमेरिकेचे हित हे एका माणसाच्या अहंकारापेक्षा नक्कीच मोठे आहे.

"आम्हाला पडद्यामागील शांत मुत्सद्देगिरीची गरज आहे. आणि कदाचित, गेल्या वर्षभरात आम्ही भारताशी जसे वागलो आहोत, त्याबद्दल अमेरिकेने कधीतरी जाहीर माफी मागणे आवश्यक आहे... राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना माफी मागणे आवडत नाही, पण अमेरिकेचे आणि जागतिक लोकशाहीचे हित हे एका माणसाच्या अहंकारापेक्षा, तो कितीही मोठा असला तरी, जास्त महत्त्वाचे आहे," असे रुबिन म्हणाले.

व्यापार तणाव आणि पाकिस्तानचे लाड

सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापारावरून तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने भारतीय निर्यातीवर ५० टक्के टॅरिफ लादले आहे, तर पाकिस्तानसाठी हेच प्रमाण केवळ १९ टक्के आहे. याशिवाय, अमेरिकेने इस्लामाबादसोबत खनिज उत्खनन आणि तेल संशोधनाबाबत करारही केले आहेत.

पाकिस्तानने ट्रम्प यांच्या या भूमिकेचे स्वागत केले होते, आणि त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकितही केले होते.

पार्श्वभूमी: 'ऑपरेशन सिंदूर'

मे २०२५ मध्ये भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले होते. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे पाकिस्तानने प्रायोजित केलेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा बळी गेला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoJK) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओनी (DGMO) भारताच्या समपदस्थांशी संपर्क साधून लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली होती, ज्यानंतर दोन्ही देशांनी पूर्ण-स्तरीय लष्करी कारवाई थांबवली होती.



Latest News