Ganeshotsav 2026: महाराष्ट्रात गणेशोत्सवाची थाटात सुरुवात, मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रदूषणमुक्त सणाचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
महाराष्ट्रात गणेशोत्सवाला थाटात सुरुवात
महाराष्ट्रात गणेशोत्सवाला थाटात सुरुवात

 

मुंबई

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईसह राज्यभरात लाडक्या गणरायाचे अत्यंत उत्साहात आगमन झाले आहे. १२ दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवाचा श्रीगणेशा घरोघरी आणि विविध सार्वजनिक मंडळांमध्ये 'प्राणप्रतिष्ठा' पूजेने झाला. लालबाग, परेलापासून ते पुण्यातील मानाच्या गणपतींपर्यंत सर्वत्र भक्तीमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन आणि व्हीआयपींची हजेरी

मुंबईतील मध्यवर्ती भाग असलेल्या लालबाग, परळ, गिरगाव आणि वांद्रे परिसरातील गणेश मंडळांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी भाविकांनी रविवारी रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्नी आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यासह 'लालबागच्या राजा'चे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही भेट दिली.

तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणरायाचे स्वागत केले. त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. ध्वनिप्रदूषण व पर्यावरण प्रदूषण रोखून पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या निवासस्थानीही शाडूच्या मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

पुण्यातील मानाचे गणपती आणि सुरक्षा व्यवस्था

पुण्यात लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वृंदावन येथील प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान झाले आहेत. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळात प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मुंबईत उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १६,८०० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. अनंत चतुर्दशीपर्यंत (२५ सप्टेंबर) चालणाऱ्या या उत्सवासाठी प्रशासनाने सुरक्षेचे चोख नियोजन केले आहे.



Latest News