मुंबई
कमकुवत पावसामुळे महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, याबाबतचा सविस्तर अहवाल मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आगामी आठ ते दहा दिवसांत चांगला पाऊस होऊन राज्यातील परिस्थिती सुधारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्या १८ जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनली आहे, तिथला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. काही भागांत नुकताच पाऊस झाला असल्याने तिथे परिस्थितीची पुनर्रचना आणि नवीन सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील जवळपास निम्मे शेतकरी सध्या पावसाच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले आहेत. गणेशोत्सवाच्या दिवसांत चांगला पाऊस होऊन पाणीटंचाई दूर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा व्यक्तीने आंदोलने करू नयेत, असे आवाहन महसूल मंत्र्यांनी केले. उत्सवाच्या काळात राज्यात शांतता, एकता आणि उत्साहाचे वातावरण असावे. कोणत्याही आंदोलनामुळे किंवा घटनेमुळे महाराष्ट्राच्या आणि समाजाच्या प्रतिमेला गमावण्याची वेळ येऊ नये, असे ते म्हणाले.
महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जमिनीच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अनेक निर्णय घेतले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. सरकार लवकरच 'लँड टायटलिंग ॲक्ट' (Land Titling Act) सादर करणार आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे निश्चित मालकी हक्क कार्ड मिळतील. याशिवाय 'पहिले मोजणी, मग नोंदणी' या तत्त्वावर आधारित कायदाही आणला जाणार आहे, ज्यामुळे जमिनीच्या सीमा आणि मालकीवरून होणारे विवाद टळतील.
तसेच, पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना' प्रभावीपणे राबवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.