एअर इंडियाच्या 'एआय१७१' (AI171) या विमान अपघाताला एक वर्ष पूर्ण झाले असून, याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात मोठी प्रगती झाली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने (AAIB) शुक्रवारी याबाबत एक अंतरिम निवेदन जारी केले आहे. सर्व आवश्यक तांत्रिक आणि आंतरराष्ट्रीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या अपघाताचा अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. १२ जून २०२५ रोजी झालेल्या या भीषण अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला होता.
गेल्या वर्षभरात तपास पथकाने या अपघाताशी संबंधित सर्व तांत्रिक, कार्यप्रणाली आणि मानवी घटकांची अत्यंत बारकाईने तपासणी केली आहे. 'एएआयबी'ने (AAIB) म्हटले आहे की, त्यांचा तपास हा स्वतंत्र आणि पुराव्यांवर आधारित आहे. विमानाच्या सिस्टीम, फ्लाइट रेकॉर्डर डेटा आणि इंजिनशी संबंधित घटकांचे विश्लेषण करण्यात मोठी प्रगती झाली आहे. या तपासाचा मुख्य उद्देश कोणालाही दोषी ठरवणे नसून, भविष्यात विमान प्रवासाची सुरक्षा वाढवणे हा आहे. त्यामुळे जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा अंदाज बांधू नये, असे आवाहनही संस्थेने केले आहे.
गेल्या वर्षी १२ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, उड्डाणानंतर अवघ्या एका सेकंदाच्या अंतराने विमानाच्या दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा खंडित झाला होता. यामुळे कॉकपिटमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. एका वैमानिकाने दुसऱ्याला इंधन पुरवठा का खंडित केला, अशी विचारणा केल्याचे व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला मिळाले होते. दरम्यान, फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सचे (FIP) अध्यक्ष सी. एस. रंधावा यांनी आरोप केला आहे की, या अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने विमानात दिवे लुकलुकत असल्याबाबत दिलेल्या जबाबाकडे तपासकर्त्यांनी पुरेसे लक्ष दिलेले नाही.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट करत सांगितले की, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रक्रियांनुसार या अपघाताचा सखोल तपास सुरू आहे. अपघातग्रस्त 'बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर' हे विमान लंडनला जात असताना उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले होते. यामध्ये २४१ प्रवासी आणि जमिनीवरील १९ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये भारत, ब्रिटन, पोर्तुगाल आणि कॅनडाच्या नागरिकांचा समावेश होता. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईतही निवृत्त क्रू मेंबर्सकडून विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.