भुवनेश्वर
ओडिशातील उत्तर आणि उत्तर-किनारपट्टी भागांत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सखल भागांतून नागरिकांच्या स्थलांतराची मोठी मोहीम हाती घेतली आहे. या पुरामुळे राज्यातील १ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले असून प्रशासनाकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी मंगळवारी संध्याकाळी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतल्यानंतर सांगितले की, तीव्र दाबाच्या पट्ट्यामुळे (Deep Depression) झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बालासोर (बाळेश्वर), भद्रक आणि जाजपूर या तीन जिल्ह्यांसाठी आगामी २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. बालासोर, भद्रक, मयूरभंज आणि जाजपूर जिल्ह्यांत १ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून, प्रशासनाने आतापर्यंत सखल भागांतून २३,६७३ हून अधिक लोकांना सुरक्षित स्थლ हालवले आहे.
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओड्राफ (ODRAF), एनडीआरएफ (NDRF) आणि अग्निशामक दलाच्या पथकांना तैनात करण्यात आले असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बाधित नागरिकांसाठी मदत केंद्रांवर तयार अन्नासह पिण्याच्या पाण्याची आणि बालकांच्या आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बालासोर, भद्रक, जाजपूर, मयूरभंज, केओंझर आणि सुंदरगड या सहा जिल्ह्यांतील शाळा, महाविद्याजे व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) काही जिल्ह्यांसाठी 'रेड' आणि 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.