नवी दिल्ली
भारताचे व्याघ्र संवर्धन हे वन्यजीव पुनरुत्थानाचे एक जागतिक मॉडेल म्हणून पुढे आले असून, सध्या जगातल्या एकूण वाघांपैकी जवळपास ७० टक्के वाघ भारतात वास करत आहेत, अशी माहिती पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी दिली आहे. दशकांची सातत्यपूर्ण धोरणात्मक मदत, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि लोकांचा वाढता सहभाग यामुळे हे यश मिळाल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, २००६ पासून भारताने वैज्ञानिक पद्धतीने मोजलेल्या व्याघ्र संख्येत दुप्पट वाढ केली आहे. अखिल भारतीय व्याघ्र अंदाज २०२२ नुसार, देशातील वाघांची संख्या ३,६८२ वर पोहोचली आहे. या सर्वेक्षणामध्ये २० राज्यांचा समावेश होता आणि पायी चालत ६.४१ लाख किलोमीटरहून अधिक क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
भारताचे व्याघ्र संवर्धनावरील धोरण हे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संस्थात्मक पाठिंब्याशी जोडलेले आहे. 'प्रोजेक्ट टायगर', राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) आणि व्याघ्र संरक्षण योजना एकत्र येऊन व्याघ्र अधिवासांसाठी एक मजबूत आणि वैज्ञानिक शासन प्रणाली पुरवत आहेत. 'प्रोजेक्ट टायगर' अंतर्गत १८ राज्यांमध्ये एकूण ५८ व्याघ्र प्रकल्पांचे जाळे तयार करण्यात आले आहे. हे प्रकल्प सुमारे ८४,५०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापतात, जे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २.५६ टक्के आहे. वन्यजीव आणि मानवी जीवन दोन्ही सुरक्षित राखत हवामान-प्रवण व्याघ्र क्षेत्र तयार करणे हे भारताचे भविष्यातील ध्येय असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.