आसाममधील पूर परिस्थिती मंगळवारी अधिकच बिकट झाली असून गेल्या २४ तासांत आणखी २१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांमधील ५.६४ लाखांहून अधिक नागरिकांना या भीषण पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षातील पुरामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या आता ३१ वर पोहोचली आहे.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात २४ तासांत १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर चराईदेवमध्ये ५, गोलाघाटमध्ये २ आणि जोरहाटमध्ये १ जणाचा बळी गेला आहे.
मुख्यमंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करणार
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री हिमंता विश्वा शर्मा यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेणार असल्याचे जाहीर केले. ढगफुटीमुळे आलेल्या या भीषण पुरामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून चराईदेव, नाझिरा, शिवसागर, सोनारी, जोरहाट आणि तीओक या भागांतील मदत छावण्यांना ते भेट देणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ८७२ गावे सध्या पाण्याखाली गेली आहेत. शिवसागर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ३.५९ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत, तर जोरहाटमध्ये ८७ हजारांपेक्षा जास्त आणि चराईदेवमध्ये ७२ हजारांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. सध्या ७१ मदत छावण्यांमध्ये १२ हजारांपेक्षा जास्त विस्थापित नागरिकांनी आश्रय घेतला आहे.
रेल्वे वाहतूक ठप्प आणि हवाई दलाकडून बचाव कार्य
अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी या भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत तर काहींचे मार्ग बदलले आहेत. अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
भारतीय हवाई दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाकडून संयुक्तपणे बचाव कार्य चालवले जात आहे. नागरिकांना अखंड मोबाईल कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून दूरसंचार विभागाने शिवसागर, चराईदेव आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये २४ जुलैपर्यंत 'इंट्रा-सर्कल रोमिंग' (ICR) सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे स्वतःचे नेटवर्क नसल्यास नागरिक इतर कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करू शकतील.