तेल खरेदी करण्या न करण्याने युद्ध संपणार नाही'; रशियन तेल आयातीवर एस. जयशंकर यांचे स्पष्टीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
कियॉव्हमध्ये युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
कियॉव्हमध्ये युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

 

कियॉव्ह 

रशियन तेलाची खरेदी थांबवल्याने युक्रेनमधील युद्ध थांबणार नाही, असा स्पष्ट शब्दांत पुनरुच्चार करत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पश्चिमी देशांच्या भूमिकेवर कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे. युक्रेनच्या अधिकृत दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी कीयॉव्ह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला हा संघर्ष तेल, खते किंवा खनिजांच्या खरेदी-विक्रीमुळे संपणार नाही, तर तो केवळ संवाद, मुत्सद्देगिरी आणि वाटाघाटींच्या माध्यमातूनच सुटू शकतो.

भारताच्या १४० कोटी जनतेसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे सांगत जयशंकर यांनी युक्रेन आणि भारताच्या भूमिकांचा परस्पर आदर केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अमेरिकेसह पश्चिमी देशांच्या दबावाखाली भारत आपल्या ऊर्जा धोरणात बदल करणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जगातील कठीण ऊर्जा परिस्थितीच्या काळात १४० कोटी लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवणे हे एक मोठे आव्हान आहे. युक्रेनचा दृष्टिकोन जसा आदरास पात्र आहे, तसेच भारताच्या भूमिकेचाही इतर देशांनी सन्मान करावा, असे ते म्हणाले.

रशियन तेल आयातीवरील पाश्चात्त्य दबाव आणि भारताची भूमिका

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा पाश्चात्त्य देशांनी मॉस्कोवर बहिष्कार टाकला, तेव्हा भारताने सवलतीच्या दरात मिळणाऱ्या रशियन कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात सुरू केली. भारत आपल्या गरजेच्या ८८ टक्के तेल आयात करतो, त्यापैकी एक तृतीयांश तेल रशियाकडून येते. अमेरिकन सिनेटने अलीकडेच रशियन ऊर्जा आयातीवर शुल्क लादणारे विधेयक मंजूर केले असले, तरी भारताने आपल्या राष्ट्रीय हिताला आणि ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत रशियन व्यापार कायम ठेवला आहे. रशियासाठी देखील युरोपीय प्रतिବंधानंतर भारत आणि चीन हे सर्वात मोठे खरेदीदार ठरले आहेत.