आरिफुल इस्लाम
आसाममधील पुरात हजारो कुटुंबांची घरे, शेतजमीन, गुरेढोरे आणि उपजिविकेची साधने वाहून गेल्याने लोक बेघर झाले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र प्रत्यक्षात ५०० हून अधिक लोकांचा जीव गेल्याचा बिगरशासकीय अंदाज आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांमधून समोर येणारी हृदयद्रावक चित्रे कोणाच्याही डोळ्यात पाणी आणण्यासारखीच आहेत.
राज्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या या संकटाने मूळचे आसामचे असलेले प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते आदिल हुसेन कमालीचे व्यथित झाले आहेत. त्यांनी या समस्येवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आदिल यांचे स्वतःचे कुटुंबही या संकटातून सुटलेले नाही. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना आदिल यांनी सांगितले की, आसाममधील त्यांचे घर आणि नातेवाईक या महापुरात गंभीरपणे बाधित झाले आहेत.
लहानपणापासून प्रत्येक पावसाळ्यात आसाममध्ये अशीच भयानक परिस्थिती पाहिल्याचे आठवून आदिल यांनी खंत व्यक्त केली. दशकानुदशके लोक या यातना सहन करत आहेत. तरीही प्रशासनाला या समस्येवर अजूनही एकही प्रभावी आणि कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "माझी मोठी बहीण, माझी भाची आणि तिचे पती आसाममधील शिवसागर येथे राहतात. त्यांचे घर या भीषण पुरात पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. मी त्यांना मदत करण्याचे मार्ग शोधत आहे. तिथली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे."
आसाममधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या प्रसिद्ध गायक पाप्पोन यांच्याशी आपण सतत संपर्कात असल्याचेही आदिल यांनी सांगितले.
आदिल म्हणतात, "माझ्या बालपणापासून मी दरवर्षी असा भीषण पूर पाहतो आहे. यंदाची परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. मी अत्यंत निराश, संतप्त आणि मनाने पूर्णपणे खचलो आहे. पूर ही सतत उद्भवणारी समस्या राहिली आहे. तरीही माझ्या बालपणापासून आजपर्यंत प्रशासन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यशस्वी झाल्याचे मला दिसलेले नाही."
वर्षानुवर्षे झालेले अनियोजित नागरीकरण आणि पर्यावरणाचा ऱ्हास याला जबाबदार धरत आदिल म्हणाले, "योग्य नियोजनाशिवाय शहरे आणि नगरांचा विस्तार झाला. उद्योगांसाठी दलदलीच्या जागा बुजवण्यात आल्या. जंगले उद्ध्वस्त केली गेली. पूरप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे हाल कमी होतील असा कोणताही दीर्घकालीन उपाय शोधण्याचा गंभीर प्रयत्न झाला नाही. आसामला एका व्यापक आणि शास्त्रीय पूर व्यवस्थापन योजनेची नितांत गरज आहे."
दरम्यान, गायक पाप्पोन यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. या अभूतपूर्व संकटाच्या काळात संपूर्ण भारतातील आणि जगभरातील लोकांना आसामला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. "या क्षणी आसाममध्ये काय घडत आहे आणि यंदाच्या पुरामुळे किती मोठे नुकसान झाले आहे, हे सर्वांना कळावे अशी माझी इच्छा आहे," असे पाप्पोन म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "आसाममध्ये दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो आणि पूर येतो. पण यंदाचे नुकसान कल्पनेच्या पलीकडचे आहे. संपूर्ण गावेच्या गावे पाण्याखाली गेली आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत. शेकडो लोक अजूनही गायब आहेत. अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत आणि अगणित जनावरे दगावली आहेत. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कृपया हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा. मी भारतभरातील आणि जगभरातील लोकांना आसामकडे पाहण्याचे आवाहन करतो. हा मानवतेचा प्रश्न आहे. आपण सर्वांनी एकत्र उभे राहिले पाहिजे. आम्ही येथे शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. तुम्हाला मदत करायची असेल तर कृपया पुढे या."
एकीकडे आपत्तीची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे संपूर्ण आसाममधून माणुसकीची प्रेरणादायी उदाहरणे समोर येत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक प्रतिष्ठाने, गुरुद्वारे, मशिदी आणि मदशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. माणुसकी ही धार्मिक सीमांच्या पलीकडे असते, हेच यातून सिद्ध होत आहे.
एका दुर्मिळ आणि संवेदनशील उपक्रमात शिवसागर जिल्ह्यातील चोंतोक बोर मशिदीने पूरग्रस्त महिलांना निवाऱ्यासाठी आपली दारे उघडून दिली आहेत. परंपरेने मशिदीच्या आवारात महिलांना जागा दिली जात नाही. परंतु या असाधारण मानवी आणीबाणीच्या काळात मशिदीने या नियमाला अपवाद केला आहे.
असाच एक प्रेरणादायी उपक्रम सर्वात जास्त फटका बसलेल्या नजिरा भागातील अमलापट्टी जुन्या मशीद समितीने हाती घेतला आहे. गेल्या आठवड्याभरापासून ही समिती पूरग्रस्तांसाठी २४ तास जेवण तयार करून पुरवत आहे. दररोज आजूबाजूच्या पूरग्रस्त गावांतील हिंदू कुटुंबांनाही दोन वेळचे जेवण दिले जात आहे.
सुरुवातीला मशिदीच्या आवारातूनच नियुक्त आचाऱ्यांच्या मदतीने अन्न शिजवून दिले जात होते. तथापि, हिंदू बांधवांची सोय आणि भावना लक्षात घेऊन समितीने नंतर हे अन्नछत्र मशिदीजवळच्या एका घरात हलवले.
जमातचे सदस्य, स्थानिक तरुण आणि जनतेच्या सढळ दानातून हा मानवी उपक्रम अखंड सुरू आहे. अन्नाव्यतिरिक्त मशीद समितीने पूरग्रस्त कुटुंबे आणि लहान मुलांना नवीन कपडे तसेच शालेय गणवेशांचे मोफत वाटप केले आहे.
या उदात्त उपक्रमांच्या माध्यमातून नजिरा मशीद समिती आणि जमातच्या सदस्यांनी केवळ अडचणीत सापडलेल्या लोकांना महत्त्वाची मदतच केली नाही, तर आसामच्या या कठीण काळात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये परस्पर विश्वास, एकता आणि बंधुभाव वाढवून धार्मिक सलोखा अधिक दृढ केला आहे.
माणुसकीचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण नलबाडी जिल्ह्यातील लोहारकाथा येथील दारुल हदीस पूर्व बारखेत्री आलिया मदशातून समोर आले आहे. या मदशाने वरच्या आसाममधील पूरग्रस्तांसाठी एक विशेष मदत मोहीम आयोजित केली होती. सर्वप्रथम विद्यार्थी आणि शिक्षकांकडून देणग्या गोळा करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अधिक मदतीसाठी स्थानिक रहिवाशांशी संपर्क साधला. भीषण पुराचा सामना करणाऱ्या आसाममधील जनतेच्या रक्षणासाठी आणि त्यांना दिलासा मिळावा म्हणून त्यांनी अल्लाकडे विशेष प्रार्थनाही केली.
सरकारी आकडेवारीनुसार यंदाच्या पुरात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. ५ जिल्ह्यांमधील ५ लाख २४ हजारहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नगाव आणि शिवसागर हे जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. संरक्षक बांध, रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी मानवी संकट कायम आहे. उद्ध्वस्त झालेल्या हजारो लोकांचे आयुष्य पुन्हा उभे करणे हे येत्या महिन्यात एक मोठे आव्हान असणार आहे.