बांगलादेशातील हिंदू मजुराच्या निर्घृण हत्येनंतर भारतीय मुस्लिम धर्मगुरूंचा तीव्र संताप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
डावीकडून अखिल भारतीय इमाम परिषदेचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इल्यासी आणि जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदानी
डावीकडून अखिल भारतीय इमाम परिषदेचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इल्यासी आणि जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदानी

 

बांगलादेशात ईशनिंदेच्या संशयावरून एका हिंदू मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण भारतीय उपखंड हादरला आहे. या क्रूर घटनेवर भारतातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरूंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. इस्लामच्या नावाखाली झालेला हा हिंसाचार केवळ गुन्हा नाही, तर हा इस्लामच्या शिकवणुकीचा घोर अपमान सुद्धा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ही घटना मयमनसिंह जिल्ह्यातील भालुका भागात घडली. तेथील एका कापड कारखान्याबाहेर २५ वर्षीय दीपू चंद्र दास या तरुणाला जमावाने मारहाण करून ठार मारले. त्याच्यावर इस्लामचा अपमान केल्याचा आरोप होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या लिंचिंगमध्ये क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या. या प्रकारामुळे माणुसकीला काळीमा फासला गेला आहे.

जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदानी यांनी या हत्येचा कठोर शब्दांत निषेध केला. त्यांनी ही घटना 'अत्यंत लज्जास्पद' असल्याचे म्हटले आहे. "मुस्लिमांकडून अशी कृत्ये होतात, तेव्हा आमची मान शरमेने खाली झुकते. या घटनेचा करावा तितका निषेध थोडाच आहे," असे ते म्हणाले. कोणत्याही सभ्य समाजात दुसऱ्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे मदानी यांनी स्पष्टपणे सांगितले. आरोप कितीही गंभीर असो, शिक्षा देण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया असते. त्याचेच पालन व्हायला हवे.

गुन्हेगार मुस्लिम आणि पीडित बिगर-मुस्लिम असल्यास हा गुन्हा अधिकच गंभीर होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. "एखाद्याची हत्या करणे किंवा अपमान करणे इस्लाममध्ये मान्य नाही. इस्लाम कोणत्याही परिस्थितीत अशा हिंसाचाराला परवानगी देत नाही," असे त्यांनी सांगितले. भारतीय उपखंडात वाढत्या उग्रवादाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हे रोखण्यासाठी सामूहिक, वैचारिक आणि कायदेशीर प्रयत्नांची गरज आहे.

अखिल भारतीय इमाम परिषदेचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इल्यासी यांनीही या हत्येला 'मानवतेला लागलेला कलंक' म्हटले आहे. दीपू चंद्र दास यांच्या मारेकऱ्यांनी दाखवलेली क्रूरता कोणत्याही धर्माच्या, नैतिकतेच्या आणि संस्कृतीच्या विरोधात आहे. इल्यासी यांनी यावर जोर दिला. "इस्लाम कोणत्याही परिस्थितीत सहकारी मानवांच्या हत्येची परवानगी देत नाही. इस्लाम इतरांचे प्राण वाचवणारा धर्म आहे, कोणाला मारणारा नाही," असे त्यांनी सांगितले.

बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले ही जगभरासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी विनंती डॉ. इल्यासी यांनी केली. त्यांनी मानवाधिकार संघटना आणि विशेषतः संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या मौनावरही प्रश्न उपस्थित केले. आंतरराष्ट्रीय समुदायाने अशा प्रकरणांमध्ये स्पष्ट आणि कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.

इल्यासी यांनी बांगलादेशी समाजाला आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले. भारताने बांगलादेशला नेहमीच साथ दिली आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. पायाभूत सुविधांचा विकास असो वा आर्थिक आणि मानवीय मदत, भारत सदैव उभा राहिला आहे. शेजारी देशांमधील विश्वास आणि सहकार्य हिंसा, द्वेष किंवा उग्रवादाने वाढत नाही. ते मानवता, कायदा आणि परस्पर आदराने मजबूत होते, असे त्यांनी सांगितले.

भारतीय मुस्लिम नेत्यांचा सामायिक संदेश स्पष्ट आहे. ईशनिंदेच्या नावाखाली होणारा हिंसाचार कोणत्याही स्वरूपात स्वीकारला जाणार नाही. हा इस्लामचा मार्ग नाही आणि कोणत्याही सभ्य समाजाचाही नाही. दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. उग्रवादाविरोधात प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर एकत्र येऊन निर्णायक कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे मानवतेवर लागलेला हा डाग आणखी गडद होणार नाही.

युकेच्या खासदार अपसाना बेगम यांनी घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले की, "दीपू चंद्र दास या हिंदू व्यक्तीची जमावाकडून हत्या करून त्यांना जाळण्यात आले. ईशनिंदेच्या आरोपावरून ही घटना घडली. या प्रकरणी पूर्ण जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. मानवाधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, अल्पसंख्याक गटांचे संरक्षण, कामगारांचे हक्क आणि ट्रेड युनियनच्या स्वातंत्र्यासाठी तळागाळातून सातत्याने मागण्या होत आहेत. जमावाच्या हिंसाचारापेक्षा या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter