बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचाराची केंद्राने गंभीर दखल घ्यावी - सरसंघचालक मोहन भागवत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली. बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराची आणि छळाची भारताने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. तेथील परिस्थिती चिंताजनक असून हिंदू समाज भीतीच्या छायेत जगत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर आयोजित वार्षिक विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी बांगलादेशातील ताज्या घडामोडींवर भाष्य केले. शेजारील देशात राहणाऱ्या अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य केले जात आहे. या घटनांकडे भारताने दुर्लक्ष करता कामा नये. भारत सरकारने याबाबत योग्य पावले उचलून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय मांडावा आणि तेथील हिंदूंना सुरक्षा मिळेल याची खात्री करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समाजातील दुर्बळता हीच अत्याचाराला निमंत्रण देते. असंगठित राहणे हा मोठा गुन्हा आहे. जगात केवळ सामर्थ्यशाली आणि संघटित समाजाचाच आदर केला जातो. त्यामुळे हिंदू समाजाने स्वतःच्या संरक्षणासाठी एकजूट आणि सामर्थ्यवान होणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला. आपण कोणाशीही वैर करत नाही, पण स्वसंरक्षणासाठी सज्ज राहणे आवश्यक असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या भाषणात त्यांनी 'सांस्कृतिक मार्क्सवादा'चा उल्लेख करत सावध राहण्याचा इशारा दिला. काही घटक शिक्षण आणि प्रसारमाध्यमांच्या आधारे समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा विघातक शक्तींपासून समाजाने सावध राहण्याची गरज आहे. भारताची प्रगती रोखण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत, त्यांना ओळखून संघटितपणे त्यांचा सामना करावा लागेल, असा संदेश त्यांनी स्वयंसेवकांना दिला. इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.