जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाचे निर्माते आणि इमार प्रॉपर्टीजचे संस्थापक मोहम्मद अलाब्बार यांनी भारतीय व्यावसायिकांचे भरभरून कौतुक केले आहे. भारतीय लोक जगातील सर्वात मेहनती लोकांपैकी एक आहेत, असे सांगत त्यांनी भारतीय टॅलेंटवर आपला मोठा विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मेक इट इन द एमिरेट्स शिखर परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले.
भारतीयांच्या कामाप्रती निष्ठेचे कौतुक
अलाब्बार यांनी सांगितले की, ते भारतीय व्यावसायिकांना नोकरीवर ठेवण्याला नेहमीच प्राधान्य देतात. त्यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, "भारतीय लोक अत्यंत विश्वासार्ह, शिस्तप्रिय आणि कामाप्रती समर्पित असतात. मला भारतीय लोकांना कामावर ठेवायला आवडते, कारण ते रात्री एक वाजता देखील तुमचा फोन उचलतात आणि जबाबदारी स्वीकारतात." ही कामाप्रती असलेली तयारी आणि समर्पण भारतीय टॅलेंटला जागतिक स्तरावर अनमोल बनवते, असेही त्यांनी नमूद केले.
बुद्धिमत्तेपेक्षा कष्टाला महत्त्व
यश केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसते, असा सल्लाही अलाब्बार यांनी दिला. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, "माझा आयक्यू सरासरी असेल, पण माझी मेहनत सर्वोत्तम आहे. मी कठोर परिश्रमांवर विश्वास ठेवतो. तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल, तितके नशीब तुमच्यावर मेहेरबान होईल. जेव्हा टॅलेंट कष्ट करायला विसरते, तेव्हा केवळ कष्टच टॅलेंटला हरवू शकतात." संधींचा अभ्यास करणे, जोखीम समजून घेणे आणि योग्य लोकांची निवड करणे ही देखील कष्टाचीच बाजू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संकटकाळातून घेतलेले धडे
२००८ चे जागतिक आर्थिक संकट आणि कोविड-१९ महामारीच्या अनुभवातून अलाब्बार यांनी व्यवसायात लवचिकता असण्याचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, संकटे येण्यापूर्वीच कंपन्यांनी स्वतःला तयार केले पाहिजे. इमारने संकटकाळात आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची आणि नोकरीची शाश्वती देऊन त्यांचा विश्वास जिंकला होता. कठीण काळात तुम्ही तुमच्या लोकांशी कसे वागता, यावरच कंपनीची दीर्घकालीन प्रतिष्ठा अवलंबून असते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.