FIDE वर्ल्ड कप ट्रॉफीला विश्वनाथन आनंदचे नाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय बुद्धिबळ विश्वातील दिग्गज आणि पाच वेळा जगज्जेते ठरलेल्या विश्वनाथन आनंद यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. गोव्यात सुरू होत असलेल्या FIDE बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या नव्या ट्रॉफीला 'विश्वनाथन आनंद ट्रॉफी' असे नाव देण्यात आले आहे. शुक्रवारी झालेल्या एका रंगतदार उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि FIDE चे प्रमुख अर्काडी ड्वोरकोविच यांच्या उपस्थितीत या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे (AICF) अध्यक्ष नितीन नारंग यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून ही घोषणा केली. ते म्हणाले, "'किंग ऑफ चेस' आणि भारताचे पहिले ग्रँडमास्टर श्री विश्वनाथन आनंद यांच्या सन्मानार्थ FIDE वर्ल्ड कप (ओपन) विजेत्याच्या रनिंग ट्रॉफीला, 'विश्वनाथन आनंद कप' असे नाव देताना अत्यंत अभिमान आणि आनंद होत आहे."

ते पुढे म्हणाले, "ही रनिंग ट्रॉफी भारतीय बुद्धिबळाच्या प्रगतीचे आणि विश्वनाथन आनंद यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे आणि वारशाचे प्रतीक म्हणून उभी आहे. बुद्धिबळाच्या भावी पिढ्यांसाठी ती शतकानुशतके जपली जाईल आणि गौरवली जाईल."

या ट्रॉफीच्या डिझाइनबद्दल ते म्हणाले, "भव्य, शानदार आणि अत्यंत प्रतिकात्मक डिझाइनमध्ये, भारताचा राष्ट्रीय पक्षी 'मोर' हा गोठलेल्या नृत्य मुद्रेत (frozen dancing form) दाखवण्यात आला आहे - हे एक असे दृश्य आहे जे खेळाचे कालातीत सौंदर्य पुन्हा जागवते."

या सोहळ्यात, विश्व महिला बुद्धिबळ कप विजेत्या दिव्या देशमुख हिच्या हस्ते स्पर्धेचे ड्रॉ (draw of lots) काढण्यात आले.

स्पर्धेचे स्वरूप आणि भारतीय खेळाडू

या २ दशलक्ष डॉलर बक्षीस रकमेच्या स्पर्धेत ८० देशांतील २०६ खेळाडू सहभागी होणार असून, यात ८ नॉकआऊट फेऱ्या खेळवल्या जातील. FIDE वर्ल्ड कप २०२५ मधून 'कॅंडिडेट्स २०२६' स्पर्धेसाठी तीन खेळाडूंची निवड होईल, जी पुढील विश्वविजेतेपदाच्या सामन्यासाठीचे प्रवेशद्वार आहे.

ही स्पर्धा सिंगल-एलिमिनेशन नॉकआउट पद्धतीने खेळवली जाईल. प्रत्येक सामन्यात दोन क्लासिकल सामने होतील. जर सामना बरोबरीत सुटला, तर तिसऱ्या दिवशी रॅपिड आणि ब्लिट्झ टायब्रेकद्वारे विजेता ठरवला जाईल.

जगातील अव्वल ५० खेळाडूंना, ज्यात भारताचा विद्यमान जगज्जेता डी. गुकेश याचाही समावेश आहे, थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश (बाय) मिळाला आहे. उर्वरित १५६ खेळाडू १ नोव्हेंबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील.

२००२ नंतर पहिल्यांदाच FIDE वर्ल्ड कप भारतात होत आहे. त्यावेळेस, आनंदनेच हैद्राबाद येथे झालेल्या अंतिम फेरीत रुस्तम कासिमजानोव्हचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता दोन दशकांनंतर, भारताकडे गुकेशच्या रूपाने तरुण जगज्जेता, ऑलिम्पियाड विजेते संघ आणि दिव्या देशमुखच्या रूपाने महिला वर्ल्ड कप विजेती आहे. याशिवाय, अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद, निहाल सरीन यांसारखे अनेक उगवते तारेही या स्पर्धेत खेळताना दिसतील.