'ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
जनरल अनिल चौहान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद साधताना
जनरल अनिल चौहान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद साधताना

 

पुणे : "भारत आता दहशतवाद सहन करणार नाही. भारतावर हल्ला झाला, तर त्याचे प्रत्युत्तरही अधिक कठोर आणि अचूक दिले जाईल. 'ऑपरेशन सिंदूर' अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. सध्या केवळ तात्पुरता शांतता करार झाला आहे. आपल्याला सजग राहण्याची गरज आहे," असे प्रतिपादन भारताचे सरसेनाध्यक्ष (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी येथे केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागा'तर्फे 'भविष्यातील युद्ध आणि युद्धतंत्र' या विषयावर जनरल चौहान यांचे विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. चारुशीला गायके, संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते. 

जनरल चौहान म्हणाले, "पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा अमानवीच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवणारा होता. त्यामुळेच आपल्या देशाने 'ऑपरेशन सिंदूर 'द्वारे ठोस कृतीतून प्रत्यूत्तर दिले. आपल्या लष्कराने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. पाकिस्तानला वाटले होते की, ४८ तासांत भारत गारद होईल. पण आमच्या कारवाईमुळे आठ तासांतच त्यांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला." पुढे ते म्हणाले, "पाकिस्तानने भारताला दहशतवादी कारवायांद्वारे वेठीस धरू नये. भारत आता दहशतवाद आणि अणुबॉम्बच्या दहशतीखाली जगणार नाही. 

भारताला दहशतवादाचा सर्वाधिक फटका 
"पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये कदाचित एक किंवा दोन दहशतवादी हल्ले झाले असतील, पण भारत सर्वाधिक दहशतवादी हल्ल्यांचा बळी ठरला आहे. जवळपास २० हजार लोक मारले गेले आहेत," या आकडेवारीतून दहशतवादाच्या समस्येची भीषणता जनरल चौहान यांनी अधोरेखित केली. 

धोका पत्करल्याशिवाय यश नाही 
दीर्घकाळ चालणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशावर ताण येतो, त्याचा अनुभव 'ऑपरेशन पराक्रम' आणि बालाकोट कारवाईत आला होता. या वेळी वेगाने आणि निर्णायक कृती करण्यात आली. मात्र, युद्धात नुकसान होते, चुका होतात; पण त्या ओळखून पुन्हा उभे राहणे, हीच खरी ताकद आहे. लष्करी कारवाईत नेहमीच धोका असतो. पण धोका पत्करल्याशिवाय यश मिळत नाही. आम्हाला विश्वास होता की, आपली प्रणाली अधिक सक्षम आहे, तीच बाब आम्ही सिद्ध केल्याचे जनरल चौहान यांनी सांगितले.